कुही : गेल्या खरीप हंगामात (२८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२०) पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे तालुक्यात पिकासह घराचे प्रचंड नुकसान झाले हाेते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले आहे. या अनुदान वाटपाकरिता पात्र शेतकऱ्यांनी आपले बँकखाते संबंधित तलाठ्याकडे त्वरित जमा करावे, असे आवाहन तहसीलदार बाबाराव तिनघसे यांनी केले.
तहसील कार्यालयामार्फत अनुदान वाटपाची अंमलबजावणी सुरू असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीचे अनुदान वाटप प्रक्रिया सुरू आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही आपले बँक खाते सादर न केल्यामुळे त्यात अडचण येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी १० फेब्रुवारीपर्यंत आपले बँक खाते संबंधित गावातील तलाठ्याकडे जमा करावे, जेणेकरून नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेईल, असेही तहसीलदारांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.