अन्नपदार्थ भेसळीची ९७ प्रकरणे : ८९ व्यापारी प्रतिष्ठानांवर धाडीनागपूर : राज्य शासनाने बंदी लावली असताना उपराजधानीत अनेक ठिकाणी सर्रास गुटखाविक्री सुरू असल्याचे दिसून येते. वर्षभराच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यातून सुमारे ८ हजार किलो गुटखा जप्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती दिली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाला विचारणा केली होती. १ एप्रिल २०१३ ते ३० जून २०१४ या कालावधीत भेसळीची किती प्रकरणे समोर आली, किती धाडी टाकण्यात आला व यात सर्वात जास्त कशाचा साठा जप्त झाला इत्यादी संदर्भात त्यांनी माहिती मागितली होती. या कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने ८९ व्यापारी प्रतिष्ठानांवर धाडी टाकल्या. यात ७, ९४५ किलो गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत ३१ लाख ८९ हजार २७२ रुपये इतकी आहे. गुटख्यावर बंदी लावणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. परंतु चोरट्या मार्गाने गुटखाविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न करण्यात येतात. मात्र शेजारच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा सुरू आहे. भेसळीची ९७ प्रकरणेया कालावधीत नागपूर जिल्ह्यात अन्न पदार्थांमध्ये भेसळीची सुमारे ९७ प्रकरणे उघडकीस आली. यातील ६१ प्रकरणांमध्ये दुय्यम दर्जाचे खाद्यपदार्थ आढळून आले तर २६ प्रकरणांत पदार्थ हे प्रकृतीसाठी असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. ३, ६६१ किलो वजनाचा नाशवंत माल (खोवा व आंबा) नष्ट करण्यात आला. भेसळीसंदर्भात १९ व्यापाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत तर २१ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. या कालावधीत १८ लाख ६१ हजार ४६१ रुपये किमतीचा १३,७२४ किलोंचा साठा जप्त करण्यात आला.(प्रतिनिधी)
वर्षभरात ८००० किलो गुटखा जप्त
By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST