डॉ. प्रकाश तुपे
जगाच्या तुलनेत भारत अवकाश संशोधनात तसा नवखा; पण झेप घेण्याची ऊर्मी मात्र जगाला थक्क करणारी. १९६३मध्ये थुंबा नावाच्या खेड्यात अग्निबाणाचा श्रीगणेशा करणारा भारत आता चक्क माणसाला चंद्रावर किंवा मंगळावर नेण्याचं स्वप्न पाहतोय.. इस्रोने नुकतीच केलेली ‘जी.एस.एल.व्ही.एम.के.३’ नावाच्या अग्निबाणाची चाचणी ही त्याच स्वप्नाच्या दिशेने झेपावणारी. थक्क करणार्या त्या प्रवासाविषयी..
-------------
गेल्या आठवड्यात भारतीय शास्त्रज्ञांनी अवकाश क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार पाडला. मानवाला अंतराळात पाठविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. भारत गेली पन्नास वर्षे छोटे-मोठे उपग्रह अवकाशात पाठवत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मोठमोठय़ा ताकदीचे अग्निबाण (रॉकेट्स) विकसित करून भारत आता माणूस अंतराळात पाठविण्याची कामगिरी करू पाहत आहे. गेल्या गुरुवारी १८ डिसेंबर रोजी, इस्रोने ‘जी.एस.एल.व्ही.एम.के.३’ नावाचा ताकदवान अग्निबाण प्रक्षेपित केला. या अग्निबाणावर ‘मानवरहित अंतरीक्ष कुपी’ ठेवली होती. ही कुपी आकाशात ११८ कि.मी. उंचीवरून पोहोचविली व तेथून ती पॅराशूट्सच्या मदतीने बंगालच्या उपसागरात सुखरूपपणे उतरविली. या प्रक्षेपणाच्या यशामुळे भारत आता चार हजार किलो वजनाएवढे पेलोड अंतराळात पाठवू शकेल. याचाच फायदा घेऊन भारतीय शास्त्रज्ञ मानवी चंद्र, मंगळ मोहिमा राबवू शकतील, अशी खात्री शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे.
जगाच्या तुलनेत भारत अंतराळक्षेत्रात नुकताच उतरला आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी १९६३ मध्ये थुंबा नावाच्या केरळच्या एका खेड्यात अग्निबाण विकसित करण्याचा श्रीगणेशा १९६३ मध्ये केला. तुटपुंज्या साहित्याच्या साह्याने त्यांनी अवघ्या ६ वर्षांत रोहिणी नावाचा छोटा अग्निबाण प्रक्षेपित करून भारतीय अंतराळ क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर जास्त ताकदीचे व जास्त वजन प्रक्षेपित करू शकणारे अग्निबाण तयार करण्याचा सपाटा शास्त्रज्ञांनी लावला व त्यातूनच ध्रुवीय कक्षेत उपग्रह नेऊ शकणारा ‘पी.एस.एल.व्ही.’ अग्निबाण १९९४ मध्ये तयार झाला. मात्र, इन्सॅटसारख्या वजनदार उपग्रहांना भूस्थीर कक्षेत म्हणजे ३६,000 किलोमीटर उंचीपर्यंत नेण्यासाठी ताकदवान अग्निबाणाची जरुरी भासू लागली. याचसाठी जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकल (जी.एस.एल.व्ही.) प्रकल्पाचा जन्म १९९0 मध्ये झाला. या प्रकल्पाचा खर्च त्याकाळी १४00 कोटी रुपये होता.
जी.एस.एल.व्ही.चे पहिले प्रक्षेपण २८ मार्च २00१ रोजी करावयाचे ठरले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ते लांबले व १८ एप्रिल २0१४ रोजी यशस्वीरीत्या हा अग्निबाण अंतराळात झेपावला. या अग्निबाणासाठी लागणारी क्रायोजेनिक इंजिने आपल्याकडे नसल्याने आपण ती रशियाकडून घेत होतो. मात्र, चार प्रक्षेपणानंतर रशियाने इंजिन देण्यास नकार दिल्याने आपला ‘जी.एस.एल.व्ही.’ प्रकल्प धोक्यात आला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी हे इंजिन तयार करण्याचा विडा उचलला व काही अपयशानंतर अखेरीस ५ जानेवारी २0१४ रोजी भारताने जीसॅट-१४ उपग्रह भूस्थिर कक्षेत पाठवून नवा इतिहास घडविला. जी.एस.एल.व्ही.च्या यशामुळे आपण वजनदार उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करू शकतो. याच प्रकल्पाअंतर्गत ‘जी.एस.एल.व्ही. मार्क ३’ अग्निबाण तयार करण्यात आला. ‘जी.एस.एल.व्ही मार्क ३’ ची क्षमता चार टनाचे वजन अंतराळात नेण्याची आहे. हा अग्निबाण ४२.४ मीटर उंचीचा व ६३0 टन वजनाचा होता. या अग्निबाणांमध्ये पहिल्या टप्प्यात प्रज्वलित होणारे २00 टन वजनाचे जुळे बुस्टर होते. दुसर्या टप्प्यात प्रज्वलित होणार्या भागामध्ये ११५ टन द्रवरूप इंधन होते. तिसरा टप्पा क्रायोजेनिक इंजिनाचा व त्यावर ३.६ टन वजनाची अवकाशकुपी होती. या मानवरहित कुपीस पुन्हा पृथ्वीवर परत आणण्यासाठीच्या यंत्रणा त्यात होत्या. प्रक्षेपण झाले तेव्हा दर सेकंदाला ३२00 किलो इंधन जाळत अग्निबाण आकाशात उंच उंच जात होता. विकास-२ इंजिन्स १ मिनिट १९ सेकंदाने प्रज्वलित झाली व जी.एस.एल.व्ही.चा वेग वाढू लागला. अग्निबाण ७१ किलोमीटर उंचीवर पोहोचल्यावर त्याचा वेग सेकंदाला २.१ किलोमीटर एवढा झाला. आता दोन्ही बुस्टर्स अग्निबाणापासून अलग झाले. आता मानवरहित अंतराळ कुपीला अग्निबाणापासून दूर करण्याची प्रक्रिया चालू झाली. ही कुपी ३ मीटर व्यासाची व २.६८ मीटर लांबीची होती. त्यामध्ये तीन भारतीय अवकाशयात्री बसू शकत होते. अवकाशकुपी वातावरणात शिरल्यावर निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेला तोंड देण्यासाठी कुपीवर हिट शिल्ड बसविली होती. अग्निबाणापासून अलग झाल्यावर अंतराळकुपीचा वेग कमी करण्यासाठी थ्रस्टर्स वापरले गेले. शेवटी कुपी जेव्हा ८0 किलोमीटर उंचीवर पोहोचली तेव्हा हे थ्रस्टर्स बंद होऊन कुपी अरबी समुद्राकडे कोसळू लागली. आता प्रक्षेपणानंतरची ९ मिनिटांची वेळ झाली व अंतराळकुपीचा वेग कमी करण्यासाठी पॅराशुटस् उघडली गेली. अंतराळकुपीचे स्थान समजण्यासाठीचे ती संदेश पाठवत असल्याने शास्त्रज्ञांना ती समुद्रात कुठे पडत आहे, याचा अंदाज येत होता. अखेरीस हे संदेश बंद होऊन कुपी समुद्रात पडली. या वेळी तिने समुद्राच्या पाण्यात एक ‘हिरवा रंग’ सोडल्याने तिचे स्थान समजून तटरक्षक दलाने ही कुपी ताब्यात घेतली. अशा रीतीने अवघ्या २0 मिनिटांच्या अवधीत श्रीहरिकोटामधून प्रक्षेपित झालेली अंतराळकुपी अंदमान-निकोबारच्या बेटांपासून १८0 किमी. अंतरावरच्या समुद्रात अलगद उतरली. चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली. या चाचणीत क्रायोजेनिक इंजिने नव्हते. मात्र, पुढील चाचणीत ते बसवून पूर्णपणे या अग्निबाणाची चाचणी घेण्यात येईल. या चाचणीच्या यशामुळे काही किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहापासून भारत आता चार हजार किलोग्रॅम वजनाचे उपग्रह अंतराळात पाळवू शकेल. या तंत्रज्ञानाचा फायदा भारताला अनेकदृष्ट्या होत असून, इतर देशांचे उपग्रह पाठविण्याची ताकददेखील भारतास प्राप्त झाली आहे. त्यामुळे परकीय चलनदेखील मिळू शकेल. भावी काळातील चंद्र व मंगळ मोहिमा व मानवी अवकाशमोहिमांना या यशामुळे हिरवा कंदील दाखविल्यासारखे झाले आहे.
(लेखक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आहेत.)