शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मैहर बँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 06:00 IST

१९१७ सालच्या महामारीत माणसे टपटप मरून पडत असताना, बाबा अल्लाउद्दिन खां यांनी उभ्या केलेल्या एका संगीत चमत्काराची कहाणी..

ठळक मुद्देकाळोखाने दाही दिशा दाटून फुटणार असे वाटत असताना उद्याचा इतिहास लिहिणाऱ्या, आज आकार घेत असलेल्या वाद्यवृंदाचे नवे जोमदार स्वर कुठून तरी तरंगत कानी येतायत. तुम्ही ऐकताय का ते? 

- वंदना अत्रे

ही गोष्ट महामारीमध्ये घडलेली...! पक्ष्यांनी दाणे टिपावे, तशी माणसे टिपत जाणाऱ्या संकटाची, पण तरीही या कथेतला नायक मात्र तो नाही. ही कथा एका संगीतवेड्या आजोबांची आणि त्यांच्या अनेक अनाथ नातवांची. मृत्यूचे तांडव सुरू असतांना विविध जातीची अन् स्वरांची वाद्य घेऊन नवे राग आणि त्यात नव्या बंदिशी रचून जगाला रसरशीत उमेद देणारे असे काही निर्माण करणारे आजोबा आणि त्यांच्या दीडशे नातवांची. कदाचित फिल्मी किंवा काल्पनिक वाटावी अशी, पण अगदी खरीखुरी..

गोष्ट मध्य प्रदेशातील मैहर नावाच्या संस्थानातली! बाबा अल्ला उद्दीन खां नावाच्या अवलिया गुरूचे आणि ब्रजनाथ सिंग नावाच्या सहृदय संस्थानिकाचे मैहर. बाबा हे या संस्थानचे राजगायक. संगीताचे शिक्षण घेण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी घरातून पळून गेल्यावर देशभर आडवी-उभी भटकंती करीत रस्त्यावरचे आयुष्य जगत अनेक गुरू आणि अनेक वाद्य याचे शिक्षण घेत समृद्ध होत गेलेला हा गुरू. ... १९००च्या आगेमागे मध्य प्रदेश आणि आसपासच्या राज्यांमध्ये लाल ताप नावाच्या एका विचित्र तापाची साथ आली. ती कशी आटोक्यात आणायची, यावर विचार करेपर्यंत भांबावलेल्या समाजात हा-हा म्हणता बळी टिपत गेली. शेतात कामावर जाणारी पुरुष मंडळी आणि बायाबापड्या या तापाला बळी पडत होते, मागे उरत होती अनाथ, एकाकी सैरभैर झालेली मुले... जगायचे कसे आणि कोणाच्या आश्रयाने याचे उत्तर ठाऊक नसलेली. संस्थानिक ब्रजनाथ सिंग तेव्हा बाबांकडून संगीताचे शिक्षण घेत होते.

एका अस्वस्थ दिवशी, गाणे थांबवत ते बाबांना म्हणाले, “अवेळी अनाथ होण्याचा शाप ज्यांच्या माथी लिहिला गेलाय, त्या मुलांना शिकवायचे का गाणे?”

- बघता-बघता दीड-दोनशे अनाथ मुले राजवाड्यावर जमली. बाबांनी प्रत्येकासाठी मनात काही वाद्यांची योजना केली होती. हार्मोनियम, बासरी, सतार, इस्रज, जलतरंग, ढोलक, पखवाज अशी बरीच भारतीय वाद्य, शिवाय राजांच्या वाड्यावर एक भला मोठा पियानो होता. व्हायोलीन आणि क्लॅरिनेट मागवले गेले. झोपडीत राहणारे अनार खान, तान्सू प्रसाद, झुरेलाल, बैजनाथ सिंग, महीपत सिंग, चुन्नेलाल, लालची सूरदास, रामस्वरूप वाद्य शिकू लागले. काही मुली पण असाव्या बहुदा.

बाबांचा दिवस सुरू व्हायचा, तो राजाच्या शिक्षणाने आणि मावळायचा तो मुलांच्या सहवासात. आठ तास राजाचे शिक्षण आणि चार तास या मुलांसाठी. मनात आकार घेत असलेल्या एका योजनेसाठी बाबांचीही तयारीही सुरू होती! तरुण वयात हबू दत्ता नावाच्या एक संगीत संयोजकांकडे बाबा काम करीत असत. अनेक वाद्यांवर वाजणाऱ्या विविध बंदिशींचा वाद्यमेळ तेव्हा बाबांनी बघितला होता. असा मुलांचा वाद्यमेळ, देशातील पहिला-वहिला बँड त्यांच्या मनात होता..! संगीत शिक्षणाचा गंधही नसलेल्या आणि महामारीने ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे, अशा अनाथ मुलांमधून बाबा तो उभा करीत होते. शास्त्रीय संगीताला बाबांनी तोपर्यंत हेमंत भैरव, मांज खमाज, गांधी बिलावल, मदनमंजिरी अशा कितीतरी नव्या रागांची देणगी दिली होती. आता या मुलांच्या वाद्यवृंदासाठी बाबा रागावर आधारित सोप्या बंदिशी तयार करू लागले, शिवाय काही पाश्चिमात्य सुरावटीही मनात होत्याच....जोमाने सराव सुरू झाला. असह्य दुःखाच्या काळात देशातील पहिला वाद्यवृंद उभा राहत होता!

वेदनेचा डंख असतांना निर्मितीच्या, सृजनाच्या आशीर्वादाचा विसर न पडणारी माणसे इतिहास घडवतात. मैहर बँड हा तो इतिहास आहे. बाबा अल्ला उद्दीन खां नावाच्या एका वेड्या कलाकाराने आपल्या संस्थानिकाच्या मदतीने निर्माण केलेला अनाथ मुलांचा मैहर बँड. देशातील पहिला वाद्यवृंद. महामारीच्या थैमानाला वेगळ्या भाषेत दिलेले उत्तर आहे ते. माणसाचे आयुष्य असे आहे-नाहीच्या टोकदार काट्यावर टांगलेले असते, उद्याचा भरवसा नसतो, अशा वातावरणातही भविष्याचे आश्वासन देणारे हिरवे कोंब त्या काट्याला फुटू शकतात हे सिद्ध करणारे.

बाबांच्या आणि त्यांच्या नातवंडांच्या या वाद्यवृंदाने पुढे त्या संस्थानात येणाऱ्या अनेक देशी-परदेशी पाहुण्यांना आपल्या वादनाने चकित केले. बाबांनी या वाद्यवृंदासाठी किमान तीनशे सोप्या बंदिशी तयार केल्या होत्या. या मुलांच्या पुढच्या पिढ्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी त्या आत्मसात केल्या. आपल्या हयातीत बाबाच या वाद्यवृंदाचे संचलन करीत. कितीतरी संगीत महोत्सवांमधून या वाद्यवृंदाला आमंत्रणे आली. २०१७ साली या वाद्यवृंदाने आपली शताब्दी थाटात साजरी केली. आजही हा मैहर बँड कार्यरत आहे.

---

काळोखाने दाही दिशा दाटून फुटणार असे वाटत असताना उद्याचा इतिहास लिहिणाऱ्या, आज आकार घेत असलेल्या वाद्यवृंदाचे नवे जोमदार स्वर कुठून तरी तरंगत कानी येतायत. तुम्ही ऐकताय का ते? या महामारीचा काळा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा बहराचे नवे रंग असलेल्या या स्वरांची नोंद त्यात होईलच...

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com