मधुकर सिरसट, केज (जि. बीड)हंडाभर पाण्यासाठी विधवा महिलेला पेटविल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. वर्षा दिना मुळे (रा. उमरी) असे या गंभीर भाजलेल्या महिलेचे नाव असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तालुक्यातील उमरी येथे रविवारी ही धक्कादायक घटना घडली.वर्षा मुळे या २०० रुपये महिन्याने भारत वामन मुळे याच्याकडून बोअरचे पाणी घेत असत. पाणी भरण्यावरून गुरुवारी त्यांच्यात वाद झाला. केज ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीही दाखल झाल्या. मात्र त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी तंटामुक्ती समितीने पुढाकार घेतला. शनिवारी दुपारी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भागवत यादव, उपसरपंच बाळासाहेब यादव, दत्ता चाळक यांच्या मध्यस्थीने तडजोड झाली होती. मात्र, रविवारी पहाटे भारत मुळे , धनराज मुळे, मनीषा मुळे हे तिघे वर्षा यांच्या घरी आले. वर्षा यांना त्यांनी घराबाहेर बोलावून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यात त्या ९५ टक्के भाजल्या. त्यांना अंबाजोगाई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.आरोपी भारत, धनराज व मनीषा मुळे यांना केज पोलिसांनी जेरबंद केले आहे. मनीषा हिचा हॉटेलचा व्यवसाय आहे. वर्षा मुळे यांचे पती दिना यांचा आठ वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांना दोन मुले असून पीठ गिरणी चालवून त्या उदरनिर्वाह करतात.
हंडाभर पाण्यासाठी विधवेला पेटविले
By admin | Updated: April 23, 2015 03:02 IST