नागेश घोपे, वाशिम - ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाशिम शहरात १९९३ ते १९९७ या कालावधीत पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात काही ऐतिहासिक अवशेष आढळून आल्यानंतरही, त्या वेळी निधीअभावी बंद पडलेले उत्खनन पुढे कधीच सुरू न झाल्याने, इतिहासाची जाण असलेल्या वाशिमकरांना अद्यापही उत्खनन सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. वाशिम शहराला राजे वाकाटकांच्या राजधानीचा ऐताहसिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळी वत्सगुल्म या नावाने ओळखल्या जाणार्या या शहराच्या उदरात नाना ऐतिहासिक पुरावे दडलेले असावे, असा कयास आहे. पुरातत्त्व विभागाने शहरात १९९७पूर्वी केलेल्या उत्खननात काही पुराव्यांचे अवशेष आढळूनही आले होते; मात्र त्यानंतर पुरेशा निधीअभावी उत्खनन बंदच झाले. उत्खनन पुन्हा सुरू व्हावे यासाठी राजकीय तथा प्रशासकीय स्तरावर झालेले प्रयत्न थिटे पडले आहेत. शहरवासीयांचा रेटा, लोकप्रतिनिधींचा आग्रह तथा प्रशासनानाच्या पाठपुराव्यामुळे, पुरातत्त्व विभागाच्या नागपूरस्थित कार्यालयाने १९९३मध्ये उत्खनन सुरू केले होते. सर्वप्रथम चांमुडा देवी परिसरातील इंगळे यांच्या शेतात या उत्खननाला प्रारंभ झाला होता. त्या ठिकाणी शिवमंदिराच्या तळातील बांधकाम, अनेक मानवी सांगाडे व वाकाटककालीन २७ ताम्रनाणी सापडली होती. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक वारशाला दुजोरा मिळाला होता. त्याच पृष्ठभूमीवर, शहरातील विविध भागांतील उत्खननासाठी त्या वेळी शासनाने पाच वर्षांचा अवधी देऊन, ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता; पण तेवढ्या निधीत पाच वर्षे उत्खननाचे काम चालले नाही. दुसर्या टप्प्यात येथील लालदेव टेकडी अर्थात दिगंबर जैनांच्या क्षेत्रपालाच्या मंदिराखाली असलेल्या टेकडीवर खोदकामास सुरुवात झाली होती. तत्कालीन संयुक्त अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व्ही.के. देशमुख यांच्या साक्षीने सुरू झालेल्या उत्खननात, अष्टभुजाकृती मंदिराचे अवशेष, चांदीची नाणी, आठ फूट उंचीचा होम करण्याचा हौद, दिगंबर जैन तीर्थंकराच्या पाषाणाच्या मूर्ती, इतर स्वयंपाकाचे लाकडी व दगडी साहित्य सापडले होते. निधीअभावी येथील काम अपूर्ण राहिले. त्यानंतर लालमियाँ दर्ग्याजवळील टेकडीचे उत्खनन करण्यासाठी नागपूर येथून पथक येणार होते; पण नंतर आजपर्यंत तेथे उत्खनन झाले नाही.
वाशिमचा इतिहास उत्खननाच्या प्रतीक्षेत!
By admin | Updated: May 26, 2014 02:56 IST