नवी मुंबई : तुर्भे हनुमान नगर व इतर झोपडपट्टीमध्ये विद्युत मीटर केबिनची स्थिती बिकट झाली आहे. केबल इतस्थत: पडल्या असून त्यामुळे विजेचा धक्का बसून दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत असून महावितरण प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिका प्रभाग ७१ चे शिवसेना शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी याविषयी महावितरण पदाधिकाऱ्यांना पत्र देवून या समस्येकडे लक्ष वेधले आहे. या परिसरामध्ये अरूंद गल्लींमध्ये विद्युत मीटर केबिन बसविल्या आहेत. पाच ते सहा वर्षापूर्वीच येथे नवीन केबिन बसविल्या होत्या. पण निकृष्टपणे काम केल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. विजेच्या केबल इतस्थत: पडल्या आहेत. या केबलला धक्का लागून दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केबिनला लहान मुलांचा किंवा नागरिकांचा हात लागला तर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय झोपडपट्टीला आग लागण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. महावितरण प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेवून ठोस उपाययोजना करावी. वेळेत दुरूस्तीचे काम सुरू केले नाही व एखादा अपघात घडला तर त्याला पूर्णपणे संबंधित प्रशासन जबाबदार राहील. मागणीनंतरही कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा तय्यब पटेल यांनी दिला आहे.
वीजवाहिन्या बनल्या धोकादायक
By admin | Updated: October 20, 2016 03:04 IST