ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवणारे विद्यासागर राव यांची महाराष्ट्राच्या तर कल्याणसिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मिझोरामच्या राज्यपालपदी बदली करण्यात आल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी राजीनामा दिला होता. शंकरनारायणन यांच्या जागी भाजपतील ज्येष्ठ नेत्याची वर्णी लागणार हे स्पष्ट असले तरी मोदी सरकार कोणाची नियुक्ती करते याविषयी उत्सुकता होती. मंगळवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने आंधप्रदेशमधील भाजप नेते विद्यासागर राव यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी शिफारस केली. तसेच राजस्थानच्या राज्यपालपदासाठी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष वाजूभाई वाला यांची कर्नाटक तर भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा मृदूला सिन्हा यांची गोवाच्या राज्यपालपदासाठी शिफारस करण्यात आली. राष्ट्रपतींनी या शिफारशींना हिरवा कंदील दाखवला आहे.
लालजी टंडन आणि विजय मल्होत्रा या भाजप नेत्यांची नावेही राज्यपालपदासाठी चर्चेत होती. मात्र मोदी सरकारने या दोघांविषयी फारशी उत्सुकता दाखवली नाही असे सूत्रांनी सांगितले.