ऑनलाइन लोकमत
राजूर, दि. २० - जालन्याजवळील भोकरदन तालुक्यातील राजूर येथे गॅस गळतीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शेतक-यांनी आज बुधवारी रस्ता रोको आंदोलन केले. या गॅस गळती प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी आंध्र प्रदेशातून बडोद्याकडे अँसीड घेऊन जाणार्या टँकरमधील गॅसकीट लिकेज झाल्याने तब्बल १४ टन विषारी वायू हवेत मिसळला.
यामुळे आठ कि.मी. पर्यंत सगळीकडे धूरच धूर दिसत होता. परिसरातील हजारो नागरिकांनी भयभीत होऊन सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भोकरदन-जालना राज्य रस्त्यावर राजूरजवळ ही घटना घडली. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती. २१ तासांनंतरही या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते.
आंध्रप्रदेश राज्यातून 'क्लोरोसल्फोनिक' नावाचा १४ टन विषारी वायू घेऊन हा टँकर ट्रक (जीजे 0६, एव्ही ३४८३) बडोद्याकडे जात होता. टँकरच्या बॉटम व्हॉल्वमधील गॅसकीट अचानक लिकेज झाली आणि वायूगळतीला सुरूवात झाली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने टँकर उभा करून पळ काढला. त्यानंतर ही बाब परिसरातील काही लोकांच्या लक्षात आली.