मराठी टक्का वाढला : तितरमारे, रामटेके, गुडधे, मेश्राम चमकले नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुरुवारी जाहीर केलेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात नागपुरातील तरुणांनी चांगलीच भरारी घेतली. नागपुरातील आवेश तितरमारे, मृण्मय रामटेके, अर्पित गुडधे व अंकुर मेश्राम यांनी या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. यापैकी आवेशने देशभरातून ४६९, मृण्मयने ८११,अर्पिलने ९२२ व अंकुरने १०८४ वे स्थान पटकाविले आहे. गत काही वर्षांत युपीएससीतील नागपूरचा टक्का वाढला आहे. यात यंदाच्या निकालाने पुन्हा भर घातली आहे. देशभरातून ४६९ व्या स्थानावर आलेल्या आवेशने मॉरिस कॉलेजच्या प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्रात युपीएससीची तयारी करून यश प्राप्त केले आहे. त्यामुळे निकाल जाहीर होताच सायंकाळी या केंद्रावर आवेशच्या मित्रांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. या केंद्रातील एकूण सात विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचले होते. परंतु त्यापैकी अंतिम यादीत स्थान मिळविण्यात केवळ आवेशला यश मिळाले आहे. सध्या येथे सुमारे ७० विद्यार्थी युपीएससीची तयारी करीत आहेत. विदर्भाचा युपीएससी परीक्षेत सहभाग वाढावा, या हेतूने सरकारच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जात आहे. अलीकडेच या केंद्रासाठी सुसज्ज नवीन प्रशासकीय इमारत व विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तयार करण्यात आले आहे. याशिवाय येथे व्हर्च्युअल लर्निंग सेंटर व वाचनालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती यावेळी या केंद्राचे प्रभारी संचालक एम. वाय. साळुंखे यांनी दिली. ते म्हणाले, शासनाकडून विद्यार्थ्यांना पुरेपूर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील बॅचपासून येथील विद्यार्थी क्षमता ७० वरून ८० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.आयएएस व्हायचेच...बीडीएस करून वैद्यकीय पदवी संपादन केली. परंतु मनात लहानपणापासून आयएएस बनण्याची इच्छा आहे. त्यामुळे बीडीएस होताच, २०११ पासून युपीएससीची तयारी सुरू केली, अन् दुसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळाले. पण मी इथेच थांबणार नाही. आयएएस बनणे स्वप्न आहे. त्यामुळे ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास यावेळी आवेश तितरमारे याने व्यक्त केला. युपीएससीच्या तयारी विषयी बोलताना, तो म्हणाला, रोज ८ ते ९ तास नियमित अभ्यास केल्यास कोणत्याही कोचिंग गरज नाही. मात्र हार्डवर्कला स्मार्टवर्कची जोड असणे आवश्यक आहे. त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. वडील सरकारी नोकरीत आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनावरच आमचे शिक्षण पूर्ण झाले आहे. म्हणजेच त्याला समाजाचा हातभार लागला आहे. अशा समाजाचे काही तरी देणं आहे, त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून नागरी सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले. आवेशचे वडील अनंत तितरमारे डिफेन्समध्ये नोकरीला आहे. त्यामुळे आवेशचे बहुतांश शालेय शिक्षण दिल्ली येथे झाले. परंतु बीडीएस मात्र त्याने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्याच्या मोठ्या भावाने गत २००६ मध्ये आयएएस उत्तीर्ण करून, सध्या बिहारमध्ये कार्यरत आहे.
युपीएससीत नागपूर शायनिंग
By admin | Updated: June 13, 2014 01:46 IST