मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतीखाली चालत असून मंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. मोदींच्या एकाधिकारशाहीशिवाय काहीही चालत नाही, असे चित्र असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रपरिषदेत केला.
मोदी सरकारला 1क्क् दिवस आज पूर्ण झाले. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन यानिमित्ताने मोदी सरकारवर तोफ डागली. मुख्यमंत्री म्हणाले, की केंद्रात ‘मिनिमम गव्हर्नन्स’च्या नावाखाली एकाधिकारशाही आणली जात आहे. गृहमंत्र्यांना आपल्या पसंतीचा पीए नेमता येत नाही. गृहमंत्र्यांच्या मुलाबाबत किंवा विदेशात जात असलेल्या एका केंद्रीय मंत्र्याबाबत किस्से बाहेर येतात; ते कोणी सांगितल्याशिवाय थोडेच बाहेर आले. अशा बातम्या पसरविणो हा देखील दहशतीचाच प्रकार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रात प्रशासनामध्ये रा. स्व. संघाच्या विचारांचे लोक मोठय़ा प्रमाणात आणले जात आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी यावेळी केला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.