पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुद्धिवादी होते. त्यामुळे त्यांनी नेहमी धर्मनिरपेक्ष विचार मांडले. धर्मग्रंथ ही केवळ परलोकातील संकल्पना असून, आधुनिक, अद्ययावत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाची कल्पना त्यांनी मांडली. जो माणूस धर्मग्रंथांपेक्षा भारताची राज्यघटना श्रेष्ठ मानतो, तोच खरा भारतीय, असे मत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी मांडले.जन्मदा प्रतिष्ठानच्या वतीने कार्तिक शुद्ध नवमी, वंदे मातरम् जयंती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५०व्या स्मृतिवर्षाचे औचित्य साधून प्रा. शेषराव मोरे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सेक्युलर हिंदुत्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले की, सावरकर एकाच वेळी प्रखर बुद्धिवादी आणि जाज्वल्य हिंदुत्ववादी होते. अंधश्रद्धा, घातक प्रथा, देवभोळेपणाला त्यांचा विरोध होता. ऐतिहासिक संदर्भ म्हणूनच धर्मग्रंथांचा वापर होऊ शकतो. आज कसे वागावे, याचे मापदंड धर्मग्रंथांमध्ये मिळू शकणार नाहीत, असे स्पष्ट विचार सावरकरांनी मांडले. मात्र, विरोधकांनी त्यांच्या विचारांचा विपर्यास केला. धर्मग्रंथांच्या बेडीतून बुद्धीला मुक्त करणारा तोच खरा बुद्धिवादी, असेच त्यांचे मत होते. त्यामुळे सावरकरांचा बुद्धिवाद समजल्याशिवाय त्यांचा हिंदुत्ववाद समजणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
घटना मानणाराच खरा भारतीय
By admin | Updated: November 22, 2015 02:09 IST