ठाणे : कळवा येथील शिवाजीनगर मार्केटमध्ये तिघाजणांवर कोयत्याने वार करणाऱ्या तिघांपैकी राजू खोमटे (२२) आणि देवेंद्र कोयंडे (३४ रा. दोघेही शिवाजीनगर, कळवा) या दोघांनाही कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. परिसरातील भाजी तसेच वडापाव विक्रेत्यांकडूनही हे टोळके खंडणी वसूल करीत होते.कळव्याच्या भास्करनगर शंभुनाथ चाळीतील रहिवाशी दिनेशकुमार गुप्ता (२५) हे १६ जुलै रोजी जेवण करुन शिवाजीनगरच्या भवानी हार्डवेअर दुकानासमोरुन सायंकाळी ६ वा. च्या सुमारास जात होते. त्यावेळी संतोष भोसले, राजू खोमटे , देवेंद्र उर्फ पिंटया कोयंडे या तिघांनी आरडाओरडा करून काही लोकांना धमकावले. त्याच वेळी त्यातील पिंट्याने गुप्ताच्या कमरेजवळ कोयत्याने वार केला. तसेच त्याच्या मामाच्या हातावर आणि त्याचा मित्र विकीच्या पाठीवर व मांडीवर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मार्केटमधील व्यापाऱ्यांना वडापाव, भाजी आणि भांडी विक्रेत्यांना कोयत्याचा धाकाने धमकावून शिवीगाळ करुन त्यांच्या हातगाड्यांचेही नुकसान केले. त्यांच्या गल्यातील पैसे जबदस्तीने हिसकावून नेले. या प्रकरणी गुप्ता यांनी १७ जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर राजू आणि देवेंद्रला पोलिसांनी अटक केली. तर त्यांचा तिसरा साथीदार मात्र पसार झाला आहे. त्यालाही अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी सांगितले. ........................
कळव्यात त्रिकुटाने केले तिघांवर कोयत्याने वार: दोघांना अटक
By admin | Updated: July 19, 2016 22:08 IST