ठाणे : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेला घोडबंदर किल्ला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) बैठकीत चर्चा झाली. आयत्या वेळच्या विषयांवरील चर्चेच्या वेळी घोडबंदरला पर्यटनस्थळ, तर शहापूरचे सातगाव, नवले कपिलेश्वरला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठीचा ठराव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.वन विभागाच्या जमिनीवर व पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणात असलेल्या घोडबंदर किल्ल्याला मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील पर्यटकांकडून मोठी पसंती आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी या किल्ल्याच्या परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे पाच लाख रुपयेही डीपीसीने मंजूर केले होते. मात्र, वन विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे तो खर्च करता आला नसल्याची खंत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्तकेली. मागील सुमारे सात वर्षांपासून या किल्ल्यासाठी सरनाईक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नास अनुसरून शिंदे यांनी या किल्ल्यास पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निदर्शनास आणून दिले.वन खात्याच्या सुमारे २० एकरच्या परिसरात हा किल्ला पुरातन विभागाच्या अखत्यारित आहे. त्यांच्या संमतीशिवाय तेथे कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा डागडुजी करता येत नसल्याचा याआधीचा अनुभव आहे. यामुळे महसूल विभागाने ५०० मीटर जागा सुशोभीकरणासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी सरनाईक यांनी लावून धरली. या विषयावरील चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून किल्ल्याचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, या किल्ल्याचा ठरावही घेण्यात आला. (प्रतिनिधी)जिल्ह्यात २७ ठिकाणी पर्यटनस्थळे घोषित करायची आहेत. त्यापैकी आठ प्रस्ताव आले असता त्यांना पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा या वेळी ठराव घेण्यात आला आहे. जिल्हाभरातील या स्थळांच्या ठिकाणी सोयीसुविधा, डागडुजी व दुरुस्तीसाठी वर्षभरात सुमारे सात ते आठ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून हा खर्च केला जातो.
ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याला मिळाला पर्यटनस्थळाचा दर्जा
By admin | Updated: August 22, 2016 03:38 IST