ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - टिपू सुलतान १९ व्या शतकातले निर्दयी राजा असून कर्नाटकमधील काँग्रेस सरकार विभाजनावदी धोरण राबवत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. टिपू सुलतान व शिवाजी महाराजांच्या तुलनेवरही शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
कर्नाटकमधील टिपू सुलतान जयंतीचा वाद चिघळत असून आता या वादात शिवसेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना टिपू सुलतान हा निर्दयी राजा असल्याचे म्हटले आहे. टिपू सुलतान यांनी हिंदूंचा नरसंहार केला व इस्लामशिवाय अन्य धर्मही अस्तित्वात आहे यावर टिपू सुलतानचा विश्वास नव्हता असा दावाही सावंत यांनी केला. कर्नटक सरकारला स्वातंत्र्यांच्या ६७ वर्षानंतर टीपू सुलतान आठवले. ही त्यांचे विभाजनवादी धोरण आहे असा आरोप त्यांनी केला.
टिपू सुलतानची शिवाजी महाराजांशी तुलना करणा-यांवरही सावंत यांनी टीका केली. शिवाजी महाराज व टिपू सुलतानची तुलना होऊच शकत नाही, शिवाजी महाराजांनी कधीच महिलांचा अवमान नाही, धार्मिकस्थळांचे पावित्र्य जपले. टिपू सुलतान असे नव्हते असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.