हितेन नाईक
पालघर- विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या भग्न मूर्ती दुसऱ्याच दिवशी किनाऱ्यावर विदारक स्थितीत पाहावयास मिळतात. कित्येक जण त्यावर टीका करतात; आणि सरतेशेवटी कुणावर तरी खापर फोडले जाते. मात्र, शिरगावच्या श्रीगणेश मित्र मंडळातील (युवा मांगेलआळी) ३० मित्रांनी एकत्र येऊन विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना होडी व इतर सेवा विनामूल्य देण्याचा पण केला आहे.गणपती बाप्पा भक्तांच्या घराघरांत स्थानापन्न होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पालघर जिल्ह्यात ३४ हजार ९८९ मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. समुद्रात विसर्जनानंतर ओहोटीच्या वेळी अवशेष किनाऱ्यावर अस्ताव्यस्त पडल्याचे वेदनादायक चित्र प्रत्येक वर्षी पाहावयास मिळत होते. बाप्पाची होणारी ही विटंबना रोखण्यासाठी शिरगावच्या श्रीगणेश मित्र मंडळाच्या रितेश निजप, अमोल तांडेल, सुजीत पागधरे, अक्षय किणी, राहुल किणी, चेतन धनू आदी ३० मित्रांनी १०-१० मुलांच्या तीन वेगवेगळया टीम बनवून आपल्याजवळील होड्यांद्वारे खोल समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. >विटंबना टाळण्यासाठीअनंत चतुर्दशीपर्यंत आपण ही सेवा विनामूल्य देणार असल्याचे अध्यक्ष रितेश निजप यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर पालघर, धनसार, अल्याळी, टेंभोडे आदी भागांतील अनेक भक्तांनी आपल्या मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी शिरगावचा समुद्रकिनारा गाठला. या वेळी कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून काही तरु ण लाइफ जॅकेटच्या साहाय्याने समुद्रात शिरणाऱ्या भक्तांवर नजर ठेवून होते.