ठाणे : मागील चार टर्म ठाणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधान परिषदेत निवडून जाणाऱ्या वसंत डावखरे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरविले आहेत. विधिमंडळात जाण्यासाठी तीन वेळा प्रयत्न करूनही अपयश मिळालेल्या फाटक यांच्याकडून चौथ्यांदा जोरदार प्रयत्न होणार असल्याने, ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. या निवडणुकीसाठी सेनेकडून कल्याण-डोंबिवली पालिकेचे सभागृहनेते राजेश मोरे यांनी डमी अर्ज भरला आहे. अर्ज छाननीतील धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून हा डमी अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले.या पूर्वी १९९२ आणि ११९८ मध्ये डावखरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे. त्यानंतर, २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी आव्हान दिले होते. २०१० मध्ये शिवसेनेने रमेश म्हात्रे यांना संधी दिली होती, परंतु ऐन वेळेस शिवसेनेने म्हात्रे यांना माघार घेण्यास भाग पाडल्याने डावखरे बिनविरोध निवडून आले होते. २००४ मध्ये रवींद्र फाटक यांना डावखरे यांनी पराभूत केले होते. त्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या फाटक यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर कोकणातून निवडणूक लढविली होती, तर २०१४ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीवर ठाण्यातून निवडणूक लढविली होती. या प्रत्येक वेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता ते उट्टे काढण्यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत. सध्याचे संख्याबळ पाहता, राष्ट्रवादीकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडे ११९ अशी ४२१ मते आपली हक्काची असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे, तर शिवसेना ३११, भाजपा १८० असे ४९१ मतांची जुळवणूक युतीची आहे, तर इतरांची ११९ मते असून ती निर्णायक ठरतील.ठाणे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज शेवटच्या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेने अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी फाटक यांच्या नावाची घोषणा करून, तासाभरात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
ठाण्यातील निवडणूक ठरणार अटीतटीची
By admin | Updated: May 18, 2016 05:23 IST