नागपूर : पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून आपण अनुभवत आहोत. निषेध करण्याचे अनेक प्रकार आहेत. परंतु पुरस्कार परत करणे म्हणजे पुरस्कार देणाऱ्यांच्या भावनेचा अनादर करणे होय. त्यामुळे सरकारच्या निषेधात पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल मला संशय येतोय, असे मत प्रसिद्ध लेखक, समीक्षक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. मारवाडी फाउंडेशनतर्फे डॉ. सदानंद मोरे यांना शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते ‘स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. मोरे म्हणाले, १९९७मध्ये मला दिलेला साहित्य अकादमीचा पुरस्कार २०१५च्या सरकारच्या निषेधात मी का परत करावा, हे मला तार्किक वाटत नाही. या वेळी भाऊ तोरसेकर यांनीही पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेचा तिखट समाचार घेतला. ते म्हणाले की, पुरस्कार हे कोणी दिलेले बक्षीस नसते. पुरस्कारामागे आपल्या कार्याची पाठ थोपटणे हा उद्देश असतो. पुरस्कार परत करणाऱ्यांनी स्वार्थासाठी पुरस्कार देणाऱ्यांचा अपमान केला आहे. ज्यांनी पुरस्कार परत केला, त्यांना पुरस्काराचा अर्थच कळला नाही.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष खा. अजय संचेती आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित होते.
पुरस्कार परत करणाऱ्यांच्या हेतूबद्दल संशय
By admin | Updated: November 22, 2015 02:08 IST