पुणे : जन्मपत्रिका पाहून त्यानुसार गुण जुळत असतील तरच विवाह करण्याचा शिरस्ता वर्षोनुवर्षापासून चालत आलेला आहे, तरीही त्यानुसार झालेले विवाह अयशस्वी ठरल्याचे मोठे प्रमाण समाजामध्ये पहायला मिळते. त्यातील थोतांड आकडेवारीनिशी समोर यावे, याकरिता महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जन्मपत्रिकेनुसार झालेल्या विवाहांचा सर्व्हे करावा अशी सूचना प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी केली आहे.आयुका येथे झालेल्या अनौपचारीक कार्यक्रमामध्ये डॉ. नारळीकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी सुचविल्यानुसार अंधश्रध्दा निर्मुलन समितीला ५ लाख रुपयांचा पुरस्कारही यावेळी देण्यात आला. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.जयंत नारळीकर यांच्या पुढाकाराने अंनिसच्या वतीने मंतिमंद मुलांच्या जन्मपत्रिका शोधण्याचे आव्हान ज्योतिषांना देण्यात आले होते. ज्या ज्योतिषांनी हे आव्हान स्वीकारले होते त्यामध्ये त्यांना सपशेल अपयश आल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवरच नारळीकरांनी जन्मपत्रिका पाहून झालेल्या विवाहांचा सर्व्हे करावा, अशी सूचना अंनिसच्या कार्यकर्त्यांना केली आहे.पत्रिकेमध्ये कडक मंगळ अशा कारणाखाली अनेक मुला-मुलींची लग्ने अडून राहतात. कुंडलीतले सर्वच्या सर्व गुण जुळल्यानंतरही झालेले विवाह पहिल्या महिन्यातच अयशस्वी ठरल्याची उदाहरणे समाजामध्ये सर्रास पहायला मिळातात. या सर्वांचा रितसर अभ्यास होऊन त्याचे डॉक्युमेंटेशन व्हावे, असे नारळीकरांनी सुचविले आहे.
जन्मपत्रिकेनुसार झालेल्या विवाहांचा सर्व्हे करावा
By admin | Updated: November 22, 2014 03:04 IST