सिंदखेडराजा: गत २४ वर्षापासून साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफीतमध्ये पडून आहे. तो प्रश्न आज नविन जिल्हे आणि तालुके होत असतांना मांडणे गरजेचे आहे. यासाठी आ.डॉ.राजेंद्र शिंगणे काय भूमिका घेतात, याकडे सर्वसामान्य जनतेच्या नजरा लागल्या आहेत. साखरखेर्डा तालुका निर्मिती क्षेत्रात संभाव्य ८५ गावाचा समावेश असून, चार जिल्हा परिषद सर्कलचे अंतर २५ की.मी.चे आत आहे. यात सिंदखेडराजा तालुक्यातील ३६, लोणार तालुक्यातील ५, मेहकर तालुक्यातील २५ आणि चिखली तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. सिंदखेडराजा मतदार संघात जी गावे आहेत; परंतु तालुके बाहेरच्या मतदार संघातील आहेत. अशी सर्व नावे साखरखेर्डा गावाशी संलग्न असून, ती सर्व गावे संभाव्य तालुक्याशी निगडीत आहेत.साखरखेर्डा गावची लोकसंख्या २0 हजार असून येथे ३ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय, चार माध्यमिक विद्यालय, तीन खासगी प्राथमिक शाळा, जि.प. प्राथमिक शाळा मराठी, कन्या आणि उर्दू शाळा आहेत. सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे यांची वैभवशाली सुतगिरणी, व्यापारी बाजारपेठ येथे असून, पाच बँकाही आहेत. दररोज हजारो लोकांची वर्दळ येथे असते. साखरखेर्डा गाव सिंदखेडराजा तालुक्यात असून, सिंदखेडराजा आणि बुलडाण्याचे अंतर सारखेच आहे. भौगोलीक दृष्ट्या सिंदखेडराजा तालुका अयोग्य असून कोठेच कशाचा मेळ नाही. मेहकर येथून १५ कि.मी. अंतरावर असलेले शेवगा जहाँगीर हे गाव ७५ की.मी. अंतरावर असलेल्या सिंदखेडराजा तालुक्यात आहे. असे विचित्र भौगोलीक क्षेत्रफळ या तालुक्याचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या समोर या अगोदर प्रश्न मांडण्यात आला होता. तत्कालीन महसुल मंत्री छगनराव भुजबळ यांनी कृती आराखडा सुद्धा मागविला होता. त्यात वसंतराव मगर, स्व.आप्पासाहेब देशमुख, स्व.सखाराम हाडे, स्व.प्रा.डी.एन.गवई, स्व. भगवानराव पाटील, भाऊसाहेब सावजी, माजी सरपंच शे.युसूफ कुरेशी, रविंद्र पाटील, राम जाधव, चंद्रशेखर शुक्ल, साहेबराव काटे, बाबुराव मोरे, आदी मंडळी तालुका मागणीसाठी पुढे सरसावली होती.त्यानंतर तालुका कृती समितीचे अध्यक्षपद डॉ.राजेंद्र शिंगणे यांना देवून संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. साखरखेर्डा तालुका निर्मितीची तब्बल २0 वर्षात फक्त जनतेतून मागणी होत होती. परंतु राजकीय पटलावर कधीच आली नाही. तालुका निर्मिती झाल्यास विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे साखरखेर्डा तालुका व्हावा, या मागणीसाठी तेजराव देशमुख, मदनशेठ जैस्वाल, दामुअण्णा शिंगणे, शिवदास रिंढे, रमेश गवई, सुनिल जगताप, राजेंद्र तळेकर, भोजराज गाडेकर यांनी वेळोवेळी उपोषणे केली आणि मागणीत जीवंतपणा ठेवला. सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा, अस्मीतेचा प्रश्न म्हणून विधानसभेत प्रश्न लावून धरावा आणि मागणीचे सार्थक करावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.
साखरखेर्डा लालफितमध्ये पडून
By admin | Updated: June 12, 2014 22:18 IST