नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता बाळगण्यात येत असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ज्या ठिकाणी नेहमीच चोऱ्या होतात तेथे एकही पोलीस ड्युटीला लावण्यात आलेला नसल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले.नागपूर रेल्वे स्थानकावर असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला आहे. दररोज प्रवाशांचे पाकीट, महागडे मोबाईल, साहित्य चोरीला जाण्याच्या घटना घडतात. सर्वात जास्त घटना चालू तिकीट कार्यालयाच्या परिसरात, पश्चिमेकडील बॅग स्कॅनरजवळील चौकशी कक्षाजवळ आणि पूर्वेकडील आरक्षण कार्यालयात घडतात. परंतु बुधवारी सायंकाळी चालू तिकीट कार्यालयात एकही लोहमार्ग पोलीस दिसला नाही. बॅग स्कॅनरजवळील चौकशी कक्षात प्रवाशांची भलीमोठी रांग असते. तेथेही गर्दीचा फायदा घेऊन अनेकदा प्रवाशांच्या पाकीट मारण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु तेथेसुद्धा एकही पोलीस ड्युटीसाठी तैनात करण्यात आलेला नव्हता. याशिवाय पूर्वेकडील संत्रा मार्केट भागात असलेल्या आरक्षण कार्यालयाच्या परिसरातही पोलीस नसल्याचे चित्र दिसले. महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावणे गरजेचे असताना नेमका तेथेच बंदोबस्त नसल्यामुळे लोहमार्ग पोलिसांची ही कुठली सुरक्षेसाठी रचलेली व्यूहरचना आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी नागपूर रेल्वे स्थानकावर सुरक्षेसंबंधी योग्य त्या सूचना देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे स्थानकावर सुरक्षेप्रति कमालीची उदासीनता
By admin | Updated: June 13, 2014 01:27 IST