मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘नानौक’ चक्रीवादळाला वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने साथ दिली असतानाच गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर उठलेल्या ४.३६ मीटर उंचीच्या लाटांचे पाणी मुंबईत शिरले. गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट, वरळी आणि शिवाजी पार्कमध्ये शिरलेल्या समुद्राच्या पाण्याने येथील रस्ते पाण्याखाली गेले व लगतची वाहतूकच कोलमडून गेली.बुधवारी तळकोकणात दाखल झालेला मान्सून वेगाने पुढे सरकत असतानाच रात्री पावणेनऊच्या सुमारास शहरात हलकासा पाऊस पडला. ‘नानौक’ चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गुरुवारी वारे वेगाने वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यातच दुपारी पावणेबाराच्या सुमारास समुद्रात आलेल्या भरतीने यात भर घातली. आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे दर्याला उधाण आले. परिणामी ४.३८ मीटर उंचीच्या उसळलेल्या लाटांनी शहरालगतच्या किनाऱ्याला कवेत घेतले. गेट वे आॅफ इंडियालगत उसळलेल्या लाटांमुळे ताज हॉटेलसमोरील रस्ता पाण्याखाली गेला. नरिमन पॉइंट येथील क्वीन्स नेकलेसवर उसळलेल्या लाटांनी येथील रस्ताही पाण्याखाली गेला. वरळी येथेही हीच परिस्थिती होती. तर शिवाजी पार्क येथील समुद्रालगतचे रस्ते पूर्वेकडे काहीसे उतारावरील असल्याने येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर समुद्राचे पाणी साचले होते. (प्रतिनिधी)
लाटांनी व्यापला रस्ता!
By admin | Updated: June 13, 2014 02:55 IST