शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण महाराष्ट्राचा पर्यटन कॉरिडॉर

By admin | Updated: May 28, 2017 01:47 IST

पण पर्यटकांसाठी किमान सहा दिवसांचा पर्यटन रिंगणात राहणारा कॉरिडॉर बनविता येऊ शकतो. त्यासाठी कशाचीही कमतरता नाही.

महाराष्ट्राने पर्यटकांना खेचून आणण्यासाठी व्यापक धोरण स्वीकारण्याची गरज आहे. कर्नाटक आणि केरळने जसे पर्यटनाचे कॉरिडॉर निर्माण केले आहेत. तसे कॉरिडॉर दक्षिण महाराष्ट्रातही तयार होऊ शकतात. यासाठी व्यापक धोरण स्वीकारण्याची गरज आहे.भारतात प्रामुख्याने दोनवेळा सुट्यांचा आनंद लुटण्याचा माहोल असतो. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या असतात. शिवाय कृषी व्यवस्थेच्या आधारावरील व्यवहारसुद्धा कारणीभूत ठरतात. इंग्रजी कॅलेंडरच्या आधारे उन्हाळ्यात मे महिन्यात या प्रामुख्याने सुट्या सुरू होतात. त्यानंतर दिवाळीच्या दरम्यान खरीप हंगामाची समाप्ती आणि हिवाळ्यातील रब्बी हंगामाची सुरुवात या दरम्यान सुट्यांचा दुसरा हंगाम सुरू होतो. याप्रमाणेच शैक्षणिक वर्षाची दोन भागात विभागणी झालेली असते. पहिल्या सुटीच्या वेळी शैक्षणिक वर्ष संपलेले असते (मे महिन्यात) आणि नव्या नव्याचा प्रारंभ होणार असतो. शिवाय याच हंगामात विवाह सोहळ्यांचा धमाका सुरू असतो. शेतीची कामेही संपलेली असतात. म्हणजे शिवारातही सुटीचा माहोल असतो. या दोन्ही सुट्यांच्या काळात प्रवासाला बाहेर पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.पूर्वीच्या काळी प्रवासाला जाणे म्हणजे धार्मिक तीर्थक्षेत्राची यात्रा करायची असा समज होता. दूरवर काशीपर्यंत जायचे किंवा त्याही पुढे हिमालयात अमरधामची यात्रा करायची, अशी प्रथा होती. आज याचे स्वरूपच बदलून गेले आहे. केवळ उच्चभ्रू नव्हे, तर सामान्य मध्यमवर्गीय माणूसही आज पर्यटनासाठी बाहेर पडू लागला आहे. संपूर्ण भारतातील पर्यटनस्थळांचा परिसर गर्दीने गजबजून जात आहे. केरळच्या बॅकवॉटरपासून तमिळनाडूचा उंटीचा परिसर किंवा कोकणातील समुद्रकिनारे किंवा गोव्याच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते आहे. शिवाय हिमालयाच्या परिसरात दार्जिलिंग, सिक्कीमपासून काश्मीर खोऱ्यापर्यंत पर्यटक जाऊ लागले आहेत. त्या प्रमाणात आता पर्यटन हा एक मोठा व्यवसाय होऊ लागला आहे. किमान एक आठवड्यापासून तीन आठवड्यापर्यंत पर्यटक भटकंतीसाठी बाहेर पडत आहेत. एवढेच नव्हे तर देशातील मध्यमवर्गीय माणूस सिंगापूर, थायलंड, मलेशिया किंवा दुबईची पर्यटन यात्रा सहजपणे करीत आहे. या पर्यटकाला केवळ धार्मिक स्थळांना किंवा ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्याचा मोह होत नाही, तर नव्या समाजाची नवनवीन मनोरंजनाच्या स्थानकांवर गर्दी करण्याची इच्छा असते. परिणामी आपल्या देशातील नैसर्गिकस्थळे, ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिकस्थळे आणि आधुनिक पायाभूत सुविधा देणारी ठिकाणे आकर्षित करीत आहेत. या सर्वांचा एकत्रित विचार करून किमान एक आठवड्याचा पर्यटन कार्यक्रम करण्याकडे नव्या पर्यटकांचा कल आहे.विविध राज्यांचे पर्यटन खातेही पर्यटकांची गरज ओळखून पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे. एखाद्या विभागात किंवा प्रदेशात किमान एक आठवड्याचे पर्यटन करता येईल त्यासाठी मनोरंजन हवे, ऐतिहासिक स्थळांची माहिती हवी, धार्मिक श्रद्धांना व्यक्त करण्याची ठिकाणे हवीत. या सर्वांसाठी दळणवळणाची साधने आणि ती वापरण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग हवे असतात. शिवाय निसर्गाने दिलेले उत्तम हवा, पाणी, वारा, थंडी, ऊन, पाऊस, आदींचा आनंदही लुटता येणे आवश्यक आहे. त्याच भागाकडे आता पर्यटकांचा कल दिसतो आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांची मजल उत्तरेत काश्मीर, उत्तर पूर्वेकडे दार्जिलिंग, गंगटोक तसेच सिक्कीमपासून कुलू-मनाली, नैनितालपर्यंत तो जाऊ लागला आहे. दक्षिणेकडे केरळचे प्रचंड आकर्षण आहे. तिरुपतीचे श्रद्धास्थान आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर कर्नाटक आपल्या नव्या पर्यटन धोरणानुसार देशभरातील पर्यटकांना आपल्या राज्याकडे ओढण्यात यशस्वी झाला आहे. पर्यटकांचा ओढा हा शहरांतील गर्दीकडून निसर्गाकडे जास्त आहे. निसर्गाच्या सान्निध्यातील धार्मिक स्थळ असो की, ट्रेनिंग किंवा वॉटर राफ्टिंगचा उद्योग असो तो करण्याचा आनंद अधिक आहे.अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानेही पर्यटकांना खेचून आणण्यासाठी व्यापक धोरण स्वीकारण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या नकाशाकडे पाहिले तर धार्मिकस्थळे, निसर्गातील आकर्षक केंद्रे आणि ऐतिहासिक स्थळे यांचा मेळ घालण्यात कॉरिडॉर तयार करण्यात कमी पडतो आहोत. परिणामी महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांपेक्षा महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. आज सहजपणे मराठी माणूस कर्नाटकामार्गे केरळ किंवा तिरुपतीमार्गे कन्याकुमारीपर्यंत धडकतो आहे. याच धर्तीवर महाराष्ट्राने औरंगाबाद परिसरातील अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या ऐतिहासिक स्थळांसह शिर्डी या धार्मिकस्थळाला जोडून घ्यायला हवे आहे. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या दक्षिण महाराष्ट्राचा कॉरिडॉर तयार होऊ शकतो. यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, आंबोली, आंबा, गगनबावडा, आदी निसर्गातील उत्तम ठिकाणे आहेत. प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, विशाळगड, सातारा आणि कोल्हापूरचे छत्रपती शिवराय तसेच शाहू महाराज यांचा देदीप्यमान वारसा, अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीचे दत्त मंदिर, गोंदवलेचे गोंदवलेकर महाराज मंदिर, मांढरदेवीचे मंदिर अशी धार्मिकस्थळे, कोयनानगर, चांदोली आणि दाजीपूर ही निसर्गरम्य अभयारण्ये, कोयना, चांदोली, काळम्मावाडी, राधानगरी, तिलारी, आदी मोठ्या धरणांचे बॅकवॉटर अशी असंख्य ठिकाणे ही पर्यटनासाठी उभी करता येतील. साताऱ्यातील महाबळेश्वर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनानिमित्त बाहेरील पर्यटकांची पावले दक्षिण महाराष्ट्राकडे वळतात. मात्र, त्याला जोडून निसर्गातील वैभव जोडले नाही. ऐतिहासिक वारसा सांगणारी स्थळांची जोडणी झालेली नाही. तीन मोठी अभयारण्ये असूनही ती बाहेरील पर्यटकांचे आकर्षण ठरत नाहीत. धरणांचे सौंदर्यही पाहण्यासारखे आहे; पण ती पर्यटन स्थानके म्हणून कधी पाहिलीच गेली नाहीत. कोयनेचे बॅकवॉटर सुमारे शंभर किलोमीटर आहे. राधानगरीचे पंचवीस, तर चांदोली व काळम्मावाडीचे चाळीस किलोमीटर आहे. तिलारीचे पश्चिम वाहिनीचे बॅकवॉटर अप्रतिम आहे. या बॅकवॉटरचा उपयोग पर्यटनासाठी म्हणून एक टक्काही होत नाही. कोयनेच्या महाबळेश्वरजवळील तापोळाचा एकमेव अपवाद असेल अशी असंख्य ठिकाणे आहेत. खिद्रापूरची पुरातनकालीन मंदिरे ही पर्यटनाच्या नकाशावर नाहीत. धरणे किंवा बॅकवॉटर नाहीत तसेच असंख्य ठिकाणेही निसर्गरम्य आहेत. तेथे वर्षा पर्यटनही विकसित करता येऊ शकते.महाराष्ट्रात असे अनेक कॉरिडॉर तयार करता येऊ शकतात. अलिबागपासून थेट गोव्याच्या वेशीवरील सिंधुदुर्गातील किरणपाणीपर्यंत सागरी किनारी मार्ग आहे. तो अद्याप बाल्यावस्थेत आहे. त्या मार्गावर अलिबाग, मुरुड, जंजिरा, दापोली, हर्णे बंदर, गणपतीपुळे, रत्नागिरी, देवगड, विजयदुर्ग किल्ला, मालवण, सिंधुदुर्ग किल्ले, वेळागर, निवती, आदी सुंदर समुद्रकिनारे आहेत. हा एक उत्तम कॉरिडॉर होऊ शकतो. त्यात निसर्ग आहे, ऐतिहासिक बाजू आहे. धार्मिक ठिकाणे आहेत आणि उत्तम खाद्य संस्कृतीची चवही आहे. तशी ती दक्षिण महाराष्ट्राची करता येऊ शकते. या सर्वच बाबी दक्षिण महाराष्ट्रात आहेत.असे प्रयोग कोठे झाले नाहीत का? शेजारच्या कर्नाटकाचेच उदाहरण घेता येईल. कर्नाटकात अशी तीन-चार कॉरिडॉर्स आहेत. बंगलोर, श्रीरंगपट्टणम्, म्हैसूर, बंदीपूरचे अभयारण्य ते उटीपर्यंत जाता येते किंवा कुर्गमार्गे कोकणातही उतरता येते. शिमोगा, श्रवणबेळगोळ, चिक्कमंगळूर, शिरसी, जोगफॉल्स, हेळ्ळेबिड-बेलूर असा मध्य कर्नाटकातील निसर्गरम्य परिसराचा भाग पाहता येतो. उत्तर कर्नाटकात हम्पी ते बदामी आणि विजापूरचा गोलघुमट पाहता येतो. त्याला जोडून तुंगभद्रा नदीवरील भले मोठे धरण म्हणजे पर्यटकांसाठी केंद्रच बनविले आहे. त्या धरणाच्या परिसरात खास बसव्यवस्था आहे. धरणाच्या बाजूला असलेल्या गेस्ट हाऊससमोरील बागेतून संपूर्ण धरण, त्याचा जलाशय आणि समोरील बाग एका नजरेत पाहता येते. धरणाची जागा म्हणजे काहीतरी अद्भुत तसेच सुरक्षेसंबंधी संवेदनशील वगैरे काही नाही, ते एक पर्यटन केंद्र होऊ शकते, अशी भूमिका कर्नाटकने घेतली आहे. म्हैसूरजवळील कावेरी नदीवरील १९२४ मध्ये बांधलेल्या कृष्णराजसागर धरणाच्या बाजूला सर्वोत्तम वृंदावन गार्डनही बनवण्यात आले आहे. म्हैसूरला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथे भेट दिल्याशिवाय पर्यटन पूर्ण झाले असे वाटत नाही. शिवाय ती गार्डन म्हणजे चित्रपट चित्रीकरणाचे महत्त्वाचे बाह्य लोकेशन ठरले आहे. ‘पडोसन’ चित्रपटातील आणि किशोरकुमार यांचे धम्माल उडविणारे गाणे याच बागेत चित्रीत झाले आहे. त्या चित्रपटाला एकोणपन्नास वर्षे झाली आहेत. तेव्हापासून ही बाग विकसित केलेली आहे. गिरसाप्पाचा धबधबा (जोग फॉल्स) पाहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. शरावती ही नदी कोसळते. ती वरपासून खालीपर्यंत पाहता येते. त्यासाठी बसून पाहण्याची सोय आहे. आपल्या साताऱ्याजवळ ठोसेघरचा धबधबा आहे. तो नीट पाहता येत नाही म्हणून वाकून वाकून पाहत दरवर्षी लोक दरीत कोसळतात आणि गतप्राण होतात. ठोसेघराचा सौंदर्यपूर्ण धबधबा नीट पाहण्याची सोयही आपणास करता येऊ नये? असंख्य लोकांचे प्राण गेल्यावरही कोणाला काहीच सुविधा करण्याचे शहाणपण सुचू नये? आंबोलीतील धबधब्यावर प्रचंड धांगडधिंगा चालू असतो. तेथे महिलांना स्नानानंतर कपडे बदलण्याची साधी सोय नाही. तिलारी परिसरात अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे. प्रचंड पाऊस आहे, वैविध्यपूर्ण वनसंपत्ती आहे. तिलारी धरण आणि त्याचे बॅकवॉटर आहे, पारगड हा ऐतिहासिक किल्ला आहे. रस्त्याच्या बाजूला अनेक छोटे-छोटे धबधबे आहेत. ते एक उत्तम पर्यटनस्थळ होऊ शकते आणि दोडामार्गाने गोव्यातही जाता येते. तो दोडामार्ग तालुका म्हणजे सौंदर्याचा खजिना आहे. या सर्वांचा मेळ घालून दक्षिण महाराष्ट्र हा पर्यटनाचा कॉरिडॉर बनविता येतो.ऐतिहासिक स्थळे, धार्मिक मंदिरे/स्थळे, निसर्गसौंदर्याची केंद्रे, धरणांच्या आजूबाजूचा प्रदेश आणि खाद्यसंस्कृती आदींचा एकत्रित विचार करायला हवा. कर्नाटकाप्रमाणे केरळने सर्वांचा विचार केला आहे. त्यांनी धरणातून कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचाही वापर पर्यटन तसेच दळणवळणासाठी करून घेतला आहे. या कॅनॉलमधून हाऊसबोटने फिरता येते. कोट्टायमजवळ सुमारे ९४ किलोमीटरचा कॅनॉल यासाठी वापरण्यात आलेला आहे. दक्षिण महाराष्ट्र हा कर्नाटकाच्या वाटेवर आहे. कोकण किनारपट्टीचा शेजार आहे आणि गोव्याच्या ओटीच्या वाटेवर आहे. आज या तीन ठिकाणी जाताना कोल्हापूर किंवा महाबळेश्वर ही प्रामुख्याने दोनच प्रमुख केंद्रे एक-दोन दिवस थांबण्याची ठिकाणे म्हणून विचार होतो; पण पर्यटकांसाठी किमान सहा दिवसांचा पर्यटन रिंगणात राहणारा कॉरिडॉर बनविता येऊ शकतो. त्यासाठी कशाचीही कमतरता नाही. त्यांना एकत्रित गुंफणारी संकल्पना राबवायला हवी.- वसंत भोसले