बारामती : तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे बारामती तालुक्यावरील दुष्काळाचे सावट कमी होण्यास मदत झाली आहे. तर, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या ओढे, नाला खोलीकरणाच्या कामांत पावसाचे पाणी साठले आहे. जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, लोणी भापकर, मोरगाव या भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. या पावसाने जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या पावसाने शेतकऱ्यांनी रब्बी पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. उशिराने केलेल्या खरिपातील बाजरीला या पावसाचा फायदा झाला. बारामती तालुका रब्बी हंगामाचा म्हणून ओळखला जातो; परंतु खरिपाच्या हंगामातदेखील बाजरीसह, सोयाबीन, कडधान्ये आदी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. सुरुवातीला पडलेल्या पावसावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर झालेल्या पेरण्या पावसाअभावी वाया गेल्या; मात्र काही शेतकऱ्यांनी उशिराने खरिपाच्या बाजरीची पेरणी केली. त्यांना हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. सध्या बारामती तालुक्यात रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या जातात. बारामती तालुक्यात जवळपास ८५ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या होतात. त्यामुळे या परतीच्या पावसाचा रब्बी हंगामाला चांगला फायदा होईल, असे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)>चार दिवसांपासून संततधार पाऊस सर्वदूर पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. सलग ४ वर्षांपासून पर्जन्यमान कमी होते. मोरगाव, लोणी भापकर, तरडोलीसह त्या भागातील २२ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष सतत आहे. त्याचबरोबर सुपे परगण्यातील सतत दुष्काळी गावांमध्येदेखील पावसाचे प्रमाण कमी होते. >पुरंदर उपसा, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांतून पाणी देण्यात आले. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी जवळपास ६३ गावांना टँकरचा आधार होता. आता या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. तालुक्यात ओढा, नाले, तलाव खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. >परतीचा पाऊस जोरदार झाल्यास प्रत्यक्ष पाणी साठवण्यासाठी उपयोग होणार आहे. सध्या मोरगाव, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे आदी भागांत केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे फलद्रूप दिसून येत आहे. या पावसाने केवळ जिरायती भागात हजेरी लावली आहे. ८५ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या...गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसाने जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, लोणी भापकर, मोरगाव भागात जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या कामातून पाणी साठल्याचे चित्र आहे. या पावसाचा रब्बीच्या पेरण्यांना उपयोग होणार आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे. बारामती तालुक्यात ८५ हजार हेक्टर रब्बी पिकांच्या पेरण्या होतात, असे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने समाधान
By admin | Updated: September 24, 2016 01:15 IST