रोहित गुरव,
मुंबई- लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामागचा उद्देश परळ-भोईवाडा येथील ‘स्वातंत्र्यसैनिक सदानंद ढवण उद्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ आवर्जून जपत आहे. स्पर्धा, इव्हेंटीकरण यांना बगल देत सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा करण्यावर या गणेश मंडळाचा भर असतो.‘भोईवाड्याचा विघ्नहर्ता’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंडळाची स्थापना १९४८ला झाली आहे. लहानमोठे कार्यकर्ते एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही हे मंडळ जपत आहे. देणगी, वर्गणी यामधून जमा होणाऱ्या पैशांचे काटेकोर नियोजन आखून जास्तीतजास्त सामाजिक सेवेवर खर्च करण्यावर मंडळाचा कल असतो. तसेच मूर्तीच्या स्पर्धेत न उतरता दरवर्षी ९ फुटांचीच बसलेली मूर्ती आणली जाते. अगदी साधेपणाने, पारंपरिक पद्धतीने व सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा केला जातो.गुणवंतांचा गौरव व ज्येष्ठांचा सत्कारशालेय व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मंडळाच्या माध्यमातून सत्कार केला जातो. तसेच विभागातील गरजू विद्यार्थ्यांना मंडळ साह्य करते. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा गणेशोत्सवादरम्यान सत्कार केला जातो.उत्सवादरम्यान सामाजिक संदेश दरवर्षी गणेशोत्सवात एखादा सामाजिक संदेश देत समाजक्रांती घडविण्याचा मंडळाचा मानस असतो. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ लोकमान्य टिळकांच्या या सिंहगर्जनेला यंदा १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या वाक्याचा प्रसार यंदा गणेशोत्सवादरम्यान केला जाणार आहे. त्यासाठी टी-शर्ट्सवर या वाक्याचा उल्लेख केला जाणार आहे, विविध उपक्रमांद्वारे हे घोषवाक्य जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे, असे योगेश मोडक या मंडळाच्या कार्यकर्त्याने सांगितले.