नवी दिल्ली : शिवसेना नेते अनंत गीते यांना देण्यात आलेल्या अवजड उद्योग खात्यावरून शिवसेनेत नाराजी असून, खाते बदलून देण्याची मागणी पक्षाने दिल्लीत भाजपाच्या नेत्यांकडे केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते यांच्या रूपाने शिवसेनेच्या वाट्याला एकमेव कॅबिनेट मंत्रिपद आले. त्यावरून शिवसेनेने कोणताही वाद घातला नाही. नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण दिल्यावरून आकांडतांडव केले नाही. पण, गीते यांना मिळालेल्या अवजड उद्योग खात्यावरून मात्र स्वत: उद्धव यांनी गीते यांच्याशी चर्चा तर केलीच शिवाय मोदींच्या कानावरही अपेक्षांचे गाºहाणे घातले. शिवसेनेचा याबाबतीतील युक्तिवाद असा आहे, अकाली दलाप्रमाणेच शिवसेना हा भाजपाचा सर्वांत जुना मित्रपक्ष आहे. या निवडणुकीत भाजपानंतर एनडीएत सर्वाधिक म्हणजे १८ जागा शिवसेनेला मिळाल्या. पण, मंत्रिपदाचे वाटप करताना १६ जागा मिळवणारी तेलगू देसम पार्टी, ६ जागा मिळविणारी रामविलास पासवान यांची लोजपा यांच्याप्रमाणेच जुनी मैत्री आणि या वेळी मिळालेल्या सर्वाधिक जागा यांचा विचार न करता एकच मंत्रिपद शिवसेनेला देण्यात आले. हा अन्याय असल्याची व पक्षाची आणखी दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदांची अपेक्षा असल्याची भावना शिवसेनेने मोदींच्या कानावर घातली आहे. तेदेपा व लोजपा यांच्या वाट्याला आलेल्या हवाई नागरी वाहतूक, अन्न व नागरी पुरवठा यांसारखे महत्त्वाचे खाते तरी शिवसेनेला द्यायला हवे होते, असा त्यांचा आग्रह आहे.
गीतेंच्या खात्यावरू न शिवसेना रुसली
By admin | Updated: May 28, 2014 04:14 IST