पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मराठा आरक्षणावरून समाजाच्या भावनेशी खेळ केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित शिवसंग्राम संघटनेचे लवकरच राजकीय पक्षात रूपांतर करणार आहे. येत्या विधानसभा निवडणुका महायुतीबरोबर लढविणार असून, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी सोमवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही मराठा आरक्षण जाहीर करण्यास काँग्रेस आघाडीने टाळाटाळ केली. त्यामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन आमदार मेटे यांनी महायुतीशी घरोबा केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत महायुतीला पाठिंबा दिला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेची भूमिका जाहीर करण्यासाठी पुण्यात सोमवारी सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, मुंबई डबेवाले संघटनेचे गंगाराम तळेगावकर, संदीप तेलगावकर, डॉ. भारती लवेकर, उदय आहेर, अॅड. विजय कातोरे आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर करण्याच्या ठरावाला एकमताने मान्यता देण्यात आली. येत्या दोन आठवड्यात नव्या राजकीय पक्षाची ध्येयधोरणे व जाहीरनामा ठरविण्यात येणार असून, २० जूनला मुंबई येथे मेळावा घेऊन पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. ते म्हणाले, काँग्रेस आघाडीच्या आमदारांना निवडून येण्यासाठी आणि सत्तेसाठी मराठा समाज बरोबर पाहिजे. परंतु, समाजाच्या अडचणी व समस्या सोडविण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी स्मारकांची केवळ घोषणाच होते. काँग्रेस आघाडीने मतासाठी शिवाजी, शाहू, फुले व डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला जातो. राज्यघटनेतील नियमानुसार आरक्षण देता येत असूनही काँग्रेस आघाडी सरकार स्वार्थी राजकारण करीत दुर्लक्ष करते. त्यामुळे शिवसंग्राम संघटना राजकारणात येऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)
शिवसंग्राम संघटनेचा करणार राजकीय पक्ष
By admin | Updated: May 27, 2014 05:42 IST