इस्लामपूर : शरद पवारांची भाकरी करपलेली आहे. तीच भाकरीच ते फिरवत आहेत. त्यामुळे इथून पुढेही त्यांचे उमेदवार करपणारच आहेत, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी इस्लामपूर येथील मेळाव्यात लगावला. इस्लामपूर येथील सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. प्रत्येक घरात पोलीस दिला तरी अत्याचार रोखता येणार नाहीत, असे गृहमंत्रीच म्हणू लागले तर या राज्यातील महिला, मुली सुरक्षित कशा राहतील, असा सवाल त्यांनी केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वर्ष झाले तरी सापडत नाहीत. पोलीस मात्र हत्येचे धागेदोरे हाती लागल्याचे सांगतात, तपासासाठी दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधतात. मग या सरकारने जादूटोणाविरोधी कायदा कशासाठी केला, अशी टीकाही त्यांनी केली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला औषधाला सुद्धा ठेवायचे नाही. सांगलीतील पाच जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढविणार असून, या सर्व ठिकाणचे उमेदवार विजयी करून सांगली भगवी झाली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. या वेळी ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देसाई, रामदास कदम, संपर्क नेते दिवाकर रावते उपस्थित होते.घोटाळेबाजांना जेलमध्ये घालणार!युतीची सत्ता आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे राज्यात दंगली होणार नाहीत. मला सहा महिने गृहमंत्री केल्यास अजित पवारांसह सगळ्या घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकेन, असा इशारा रामदास कदम यांनी दिला. (वार्ताहर)
शरद पवारांची भाकरी करपणारच
By admin | Updated: July 14, 2014 03:58 IST