ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात आले तर, आम्ही पाठिंबा देणार नाही. हे मी लिखित मध्ये लिहून द्यायला तयार आहे. पण तसेच शिवसेनेनेही पाठिंबा काढणार हे लिहून द्यावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. शनिवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले.
शिवसेनेने मुंबई आणि अऩ्य महापालिका निवडणुकीसाठी भाजपा बरोबरची युती तोडली आहे. दोन्ही पक्ष दररोज परस्परांवर टोकाची टीका करत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपा बरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचे विधान केले आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार असल्याची चर्चा आहे.
उद्या असे घडलेच तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला साथ देईल अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा खुलासा केला. भाजपा राजकारणातल्या पारदर्शकतेबद्दल बोलते. पण सध्या प्रचारामध्ये ते भरपूर पैसा खर्च करतायत. मुंबईमध्ये हे सर्वत्र दिसतेय अशी टीका पवारांनी केली तसेच नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वत्र क्षेत्रांना फटका बसला. छोटया व्यवसायातील रोजगार कमी झाले. अनेक गावांना फटका बसला असे त्यांनी सांगितले.