ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ९४ वर्षीय पेंढारकर यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्यक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
२५ नोव्हेंबर १९२१ साली जन्मलेले भालचंद्र पेंढारकरण नाट्यवर्तुळात अण्णा या नावाने प्रसिद्ध होते. 'ललित कलादर्श' ही त्यांनी उभारलेली नाट्यसंस्था असून त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन, नेपथ्य, छायाचित्रण, नाट्य निर्मिती अशा अनेक क्षेत्रात काम केले. दुरितांचे तिमीर जावो, पंडितराज जगन्नाथ, गीत गाती ज्ञानेश्वर ही पेंढारकर यांची विशेष गाजलेली नाटके आहेत.
नाट्यक्षेत्रातील योदगादानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. विष्णुदास भावे पुरस्कार (१९७३), बालगंधर्व पुरस्कार (१९८३), केशवराव भोसले पुरस्कार (१९९०), जागतिक मराठी परिषद (१९९६), संगीत नाटक कला अकादमी (२००४) , तन्वीर पुरस्कार (२००५) असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले तर २००६ साली त्यांना चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आज सकाळी ११.३० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात ठेवण्यात येणार आहे.