पिंपरी : आलिशान मोटारी, सदनिका, गलेलठ्ठ पगाराची नोकरी असलेल्या चतुर मंडळींनी कमी उत्पन्नाचा दाखला मिळवून पाल्याचा इंग्रजी शाळेतील प्रवेश आरटीईच्या माध्यमातून केला आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई २५ टक्के आरक्षणात धनदांडग्यांनी लाभ उठविल्याने खरे गरजू मात्र वंचित राहिले आहेत. मात्र, काही संस्थाचालकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित पालकांच्या पाल्याचा प्रवेश रद्द करण्यात आलेला आहे. परंतु, यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण किंवा काम करणारी सर्वेक्षणात्मक समिती नाही. त्यामुळे ज्यांना प्रवेश मिळणे अत्यंत गरजे आहे, त्यांना न मिळता, इतरांनाच आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश मिळू लागला आहे. एका नामांकित शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून एका पालकाने खटाटोप करून उत्पन्नाचा दाखला मिळवला. प्रवेशासाठी शाळेकडे तो सादर केल्यास लक्षात आले की, शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती महिन्याला साठ हजार रुपये पगार मिळवूनही आरटीई प्रवेशाचा लाभ घेऊ इच्छित आहे. तेव्हा शिक्षण मंडळ प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर प्रवेश रद्द के ला आहे. आरटीईच्या माध्यमातून कित्येक पालकांचे अद्यापपर्यंत प्रवेश झालेले नाहीत. काही पालकांकडे कागदपत्रे अपूर्ण आहेत, तर काही गरजू पालक प्रवेश कसा घ्यायचा, या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ आहेत. खऱ्या अर्थाने गरजू आहेत, त्यांच्याऐवजी धनदांडगे लोकच आरटीईअंतर्गतच्या प्रवेशाचा लाभ उठवत आहेत, असा आरोप संस्थाचालक करू लागले आहेत. अल्प उत्पन्न दाखवून, तसेच नगरसेवक, आमदार, खासदार यांची शिफारसपत्रे जोडून प्रवेशासाठी आग्रह धरला जातो. सध्या आरटीईचे शैक्षणिक शुल्क शासनाने १७,३२९ रुपये देण्याचे मंजूर केले आहे. यापूर्वी ते १३,४७४ होते. सर्व शाळांना हे शुल्क परवडत नाही. त्यामध्ये वाढ झाली आहे. नेमके गरजू कोण? कोणाला आरटीईचा लाभ मिळणे आवश्यक आहे? हे तपासण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणे गरजेचे आहे, असे संस्थाचालक, शाळा व्यवस्थापनाला वाटते. या माध्यमातून प्रवेश मिळविण्याचे गैरप्रकार वाढू लागले आहेत. (प्रतिनिधी)धनदांडग्या पालकांनी आरटीईतून प्रवेश मिळवून पैसे वाचविण्याचा वेगळा फंडा शोधला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अशा प्रकारे प्रवेश मिळाल्यास खासगी शाळेच्या तुलनेत ४० ते ५० हजार रुपयांची बचत होते. शिवाय, सर्व साहित्यही मोफत मिळते. २५ टक्क्यांतील प्रवेशामध्ये धनदांडगेच अधिक लाभ उठवत आहेत. - राजेंद्र सिंग, इंडिपेंडंट स्कूल असोसिएशन प्रवेश घेण्यासाठी पालक चारचाकीतून येतात. हातात स्मार्ट फोन आणि अंगावर सोनं दिसून येते. त्यांच्याकडे पाहून वाटत नाही की, या पालकांना आरटीईतून प्रवेश मिळायला हवा. पालकांकडे चौकशी केली असता सांगतात की, आमचा प्रवेश घेण्याचा हक्क आहे. शाळेलाच उलटी उत्तरे दिली जातात. तक्रार करण्याची धमकी दिली जातात. अशा पालकांना बोलणेही अवघड आहे. - जागृती धर्माधिकारी, संस्थाचालक धनदांडग्या व्यक्ती जर आरटीईच्या माध्यमातून प्रवेश घेत असतील, तर पायबंद घालणे गरजेचे आहे. संबंधित संस्थाचालकांनी अशा बाबी निदर्शनास आणून द्याव्यात. अशा व्यक्तीची कागदपत्रे तपासणी केली जाईल. तसेच, त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेऊनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे धोरण अवलंबावे लागणार आहे. - बी. सी. कारेकर, प्रशासन अधिकारी गरीब विद्यार्थी प्रवेशापासून वंचितकागदपत्रांची जमवाजमव करण्याचा खटाटोप करूनही आरटीई निकषात काही विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. अनेकांचे प्रवेश विविध कारणास्तव रद्द झाले आहेत. आरटीईच्या जागा रिक्त असूनही अनेक गरीब, गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. गोरगरिबांना आरटीई प्रवेशाचा लाभ मिळत नसल्याने पालकांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.
‘आरटीई’वर धनदांडग्यांचा डल्ला
By admin | Updated: July 1, 2016 01:58 IST