नागपूर : विविधतेत एकता जपणाऱ्या आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या हिंदू संस्कृतीमुळेच देश अखंड असून, काही छोट्या-मोठ्या घटना घडतात; पण त्याचे मोठे चित्र निर्माण केले जाते, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच दादरी प्रकरणावर सूचक भाष्य केले. शिवाय, लोकसंख्येच्या असंतुलनामुळे समस्या निर्माण होऊ नये यासाठी मतांचे राजकारण दूर सारून देशात समान लोकसंख्या धोरण असावे, अशी सूचना केली. सरसंघचालकांचे हे वक्तव्य समान नागरी कायद्याबाबत असल्याचे मानले जात आहे.प्रतिवर्षीप्रमाणे रा. स्व. संघाचा शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे पार पडला. या वेळी बोलताना डॉ. भागवत यांनी नीति आयोगापासून आंतरराष्ट्रीय संबंधापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. विशेषत: लोकसंख्येवर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात नव्या चर्चेला तोंड फुटू शकते. ते म्हणाले, दिवसेंदिवस देशाची लोकसंख्या वाढत आहे. ५० वर्षांनंतर ही लोकसंख्या ओझे होऊ नये व मनुष्यबळाचा योग्य वापर व्हावा यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. समान लोकसंख्या धोरण शासन व कायद्याच्या आधारावर लागू होणार नाही. त्यासाठी समाजाची मान्यता घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. देशाची निवडणूक व्यवस्था, प्रशासन, कर व्यवस्था, उद्योग धोरण, शिक्षणप्रणाली तसेच कृषी धोरणात आमूलाग्र बदलाची गरज असल्याचे सांगत त्यांनी नव्या बदलाचे सूतोवाच केले. दुसऱ्या हरित क्रांतीची गरज... या कार्यक्रमाला ‘नीति’ आयोगाचे सदस्य डॉ. विजय कुमार सारस्वत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सारस्वत यांनी देशाच्या प्रगतीसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत यावर भाष्य केले. देशाची लोकसंख्या लक्षात घेता दुसऱ्या हरित क्रांतीची आवश्यकता असून, कृषीमालाचे योग्य ‘मार्केटिंग’देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात संशोधनासाठी वेगळ्या ‘आयआयटी’ची गरज असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. या कार्यक्रमाचे संघाच्या संकेतस्थळावर तसेच दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्री, गडकरी संघ गणवेशात...विजयादशमी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी हे संघ गणवेशात उपस्थित झाले होते. दोघेही मंत्री म्हणून नव्हे, तर स्वयंसेवक म्हणून आले होते. मुख्यमंत्री कुठलीही सुरक्षाव्यवस्था, तसेच शासकीय वाहन न घेता खासगी वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहोचले. राज्याचे मुख्यमंत्री संघाच्या विजयादशमी उत्सवात उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती हे विशेष.नरेंद्र मोदी सरकारला शाबासकीगेल्या २ वर्षांपासून देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थव्यवस्था, राष्ट्राची सुरक्षा यासंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणांमुळे विकसित व समर्थ भारताच्या निर्माणाचा विश्वास जनतेत उत्पन्न झाला आहे, अशा शब्दांत सरसंघचालकांनी केंद्र शासनाचे कौतुक केले. विकास हा समन्वयातून व्हायला हवा. विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहेत का? याचा आढावा घेतला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वांशी संवाद साधला पाहिजे, या शब्दांत मोदी सरकारला सल्लादेखील दिला.‘संथारा’ बंदीवर प्रहार जैन धर्मीयांच्या ‘संथारा’ परंपरेवर न्यायालयाने आणलेल्या बंदीवर डॉ. भागवत यांनी टीका केली. जैन धर्मात या गोष्टी प्राचीन काळापासून सुरू आहेत. असा निर्णय घेण्याअगोदर जैन धर्मातील मुनींशी चर्चा करणे आवश्यक होते. परंतु धर्माशी संबंधित निर्णय चर्चा न करताच केल्यामुळे नागरिकांच्या भावनांना ठेच पोहोचते. अपुरी दृष्टी असलेल्या कायद्याच्या आधारावर धार्मिक परंपरांमध्ये बदल करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची प्रशंसासरसंघचालकांनी भाषणाची सुरुवातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीची प्रशंसा करत केली. देशातील आर्थिक व सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढाकार घेतला व वंचितांना मुख्य प्रवाहात आणले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतले. बुद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा निर्णयदेखील त्यांनी प्रदीर्घ चर्चा व विचारानंतरच घेतला होता, असे डॉ. भागवत म्हणाले.
देशात हवे समान लोकसंख्या धोरण!
By admin | Updated: October 23, 2015 04:11 IST