भोर : खरीप हंगामाचा आढावा तोच आहे, फक्त वर्ष वेगळे आहे. यात बदल व्हायला हवा. पुरेशा प्रमाणात बियाण्याचे वाटप करुन चारसूत्री पद्धत, युरिया ब्रिकेटचा वापर करुन तालुक्यातील भाताची लागवड वाढली पाहिजे तरच पिकात वाढ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे गरजेचे आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.राज्य शासन कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०१६/१७ नियोजन व आढावा सभेचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी थोपटे बोलत होते. या वेळी जि.प. अध्यक्ष प्रदीप कंद, कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, महिला बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, जि.प. सदस्या तृप्ती खुटवड, तहसीलदार वर्षा शिंगण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, सभापती नंदा शेडगे, उपसभापती रोहिणी बागल, माजी सभापती रणजित शिवतरे, संतोष घोरपडे, सतीश चव्हाण, सुर्वणा मळेकर,गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, मंडल अधिकारी हनुमंत खाडे, उपअभियंता जाधव, कृषी अधिकारी जयेश भुतपल्ले, सरपंच ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी उपस्थित होते.खरीप हंगामाकरिता पुरेशा प्रमाणात खते, बी-बियाणे उपलब्ध करुन दिली जातील मात्र शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार असल्यास लेखी स्वरुपात दिल्यास संबंधित दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल. मात्र शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे असे कंद यांनी सांगितले.प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची सविस्तर महिती दिली.शेतकऱ्यांना माफक दरात वेळेवर आणि चांगल्या प्रमाणात धान्य उपलब्ध करुन दिल्यास चांगले पीक येईल त्याचबरोबर अनेक गावात भाताची शेती कमी आहेत अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे प्रशिक्षण देऊन प्रोेत्साहन द्यावे अशी मागणी रणजित शिवतरे यांनी केली.महाबीजच्या जांभेकर व महाजन यांनी कंपनीच्या वतीने खरीप हंगामासाठी १६०० क्विंटल बियाणांची गरज असून ८०० क्विंटल बियाणाचे वाटप झाले आहे. उर्वरित बियाणे मे महिनाअखेर पुरवठा करण्यात येणार आहे, असे सांगितले.या वेळी वंदना धुमाळ, तृप्ती खुटवड यांनी मनोगत व्यक्त केले. आभार जयेश भुतपल्ले यांनी मानले.
खरिपाचा आढावा तोच; फक्त वर्ष वेगळे
By admin | Updated: May 21, 2016 01:11 IST