अलिबाग : वैज्ञानिक आणि संशोधकांच्या संशोधनाने मानवाचे जीवन सुसह्य करणारे संशोधक पडद्यामागेच असतात, ते सहसा विश्वाच्या रंगमंचावर सर्वांसमोर येत नाहीत. म्हणूनच अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांची सर्वांनी दखल घेणे आवश्यक असल्याचे गौरवोद्गार रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी बुधवारी काढले.ईस्ट इंडिया कंपनीच्या तत्कालीन सरकारने मुंबईत कुलाबा येथे सन १८४१ मध्ये स्थापन केलेल्या भूचुंबकीय वेधशाळेच्या निमित्ताने देशात सुरु झालेल्या भूचुंबकीय नोंदी अभ्यासास यंदा १७५ वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय भूचुंबकत्व संस्थेचे यंदाचे हे वर्ष भूचुंबकीय नोंदी अभ्यासाचे शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत असून, त्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम येथील भूचुंबकीय वेधशाळेत करण्यात आला होता. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या कुलाबा (मुंबई) वेधशाळेचे प्रमुख संशोधक प्रोफेसर डॉ. सत्यवीर सिंग व जे. एस. एम.कॉलेजचे प्राचार्य डॉ. नीळकंठ शेरे व्यासपीठावर उपस्थित होते.सन १८४१ मध्ये मुंबईत कुलाबा येथे स्थापन झालेल्या भूचुंबकीय वेधशाळेच्या चुंबकीय नोंदींमध्ये, मुंबईत सुरु झालेल्या विजेवरील ट्राममुळे व्यत्यय येवू लागल्याने सन १९०४ मध्ये कुलाबा येथील ही वेधशाळा, भारतीय भूचुंबकीय संस्थानचे पहिले संचालक आणि भूचुंबकत्व अभ्यासक नानाभाई फ्रामजी मूस यांनी अलिबाग व कुलाबा येथील दोन वर्षांच्या समांतर नोंदींच्या विशेष अभ्यासांती अलिबाग येथे स्थापन केली. या वेधशाळेत या १७५ वर्षांच्या प्रवासात मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या कुलाबा (मुंबई) वेधशाळेचे संशोधक प्रोफेसर डॉ.सत्यवीर सिंग यांनी केले. (प्रतिनिधी)
संशोधक हे पडद्यामागेच असतात
By admin | Updated: September 22, 2016 04:56 IST