मुंबई : पेण अर्बन बँकेच्या १० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना चार आठवड्यांत ठेवी परत करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने गुरूवारी दिले. त्यामुळे सुमारे १ लाख ३२ हजार खातेधारकांना त्यांची रक्कम परत मिळणार आहे.बँकेच्या थकित कर्जदारांकडून सुमारे ५४ कोटी रुपये वसुली करण्यात आल्याचे अॅड. राजेंद्र रघुवंशी यांनी सांगितले. बँकेची बाजू मांडताना रघुवंशी आणि ऋतुजा आंबेकर यांनी एकूण १ लाख ७८ हजार ६३२ खातेदारांच्या अडकलेल्या रकमेबाबत माहिती दिली. शिवाय बँकेच्या थकबाकीदारांकडून वसुली करण्याची परवानगी मागितली. त्यावर हायकोर्टाने आदेश देत १० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना चार आठवड्यांत पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.खातेधारकांचे वर्गीकरण करताना १ हजारपर्यंतच्या ठेवी, २ हजार पर्यंतच्या ठेवी, २ ते ५ हजार दरम्यानच्या ठेवी आणि ५ ते १० हजार रुपयांदरम्यानच्या ठेवी ठेवलेल्या खातेदारांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यात १ हजार रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या खातेदारकांची संख्या ९२ हजार ९१३ इतकी आहे. २ हजार रुपयांच्या ठेवी असलेल्या खातेधारकांची संख्या १५ हजार ४६३ इतकी आहे. २ ते ५ हजार रुपयांच्या ठेवी असलेले १४ हजार ७९८ खातेधारक असून ५ ते १० हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी असलेल्यांची संख्या ११ हजार १३८ इतकी आहे.(प्रतिनिधी)
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
By admin | Updated: August 21, 2015 00:44 IST