चटक चांदण्यांचा, पलंग काय हाकला अंगणातइथं नाही करमत, चला जाऊ लाल बागेतलाल बागेची, हवा गं लय न्यारी,फुलाचा येत वास सुंदरी, मांडवर बस,तुला ग बंगला बांधून देतो,आता घेतल्या भाताच्या पाट्या,घेतल्या मोत्याच्या चुंभळा,पहिल्या वनाला लागले पाहिजे बार्ईजी,आपण मागून गौराईला जाऊ जी...
भीमाशंकर : भातआवणीची पारंपरिक गाणी गुणगुणत आदिवासी शेतकरी भातआवणीच्या कामात गुंतले आहेत. पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे भातखाचरे पाण्याने भरली आहेत. भातरोपेही तरारून आली असून, वाऱ्यावर सळसळ करीत आहेत. सध्या भातआवणीला पोषक वातावरण आहे.आंबेगाव तालुक्यात सुमारे ४,८०० हेक्टर भातक्षेत्र असून, त्यापैकी ४० टक्के आवण्या पूर्ण झाल्या आहेत. या भागात जिर, रायभोग, इंद्रायणी, तांबडा रायभोग, आंबेमोहोर, साळ, कोळंबा, नानपुडा, झिनी, खडक्या, ढवळाभात, कुसळ्या या जातीचे भात घेतले जातात. भात आवणीदरम्यान पाऊस पडत असल्यामुळे रोगाचे प्रमाणही कमी राहणार आहे. भाताबरोबर आदिवासी भागात पावसाळ्यात नाचणी, वरई, सावा, तूर, वाटाणा इत्यादी कडधान्यांची शेती केली जाते. यांचीही लागवड डोंगरउतारावर जोरात सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यातील पावसामुळे काही ठिकाणी भातरोपे सडलेली दिसून आली आहेत.(वार्ताहर)