मुंबई/सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्य आरोपी असलेले महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम फरार झाले आहेत. सीआयडीने सोमवारी मुंबईतील त्यांचे निवासस्थान आणि काही संस्थांवर छापे टाकले. भ्रष्टाचारप्रकरणी कदम यांच्यासह पाच जणांविरुद्ध मुंबईच्या दहीसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी त्यांच्या शोधासाठी तुळजापूरला (जि. उस्मानाबाद) गेलेले पोलीस पथकही रिकाम्या हाताने परतले. मात्र रमेश कदम यांची शोधमोहीम ग्रामीण पोलिसांनी सुरूच ठेवली आहे. शनिवारी रात्री गुन्हे दाखल झाल्यानंतर कदम यांनी रविवारी सोलापूरमध्ये पत्रपरिषद घेतली होती. त्याचवेळी आपल्याला अटक होणार असल्याची कुणकुण त्यांना लागल्याने पत्रकार परिषद अर्धवट सोडून ते निघून गेले. त्यानंतर काही वेळाने ग्रामीण आणि शहर पोलीस दलाचे पथक तेथे आले. होटगी रोडवरील बालाजी सरोवरमध्ये रमेश कदम उतरल्याचे समजताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. ज्या रूममध्ये ते उतरले, त्याच रूममध्ये त्यांचा मोबाईल होता. कदाचित हॉटेलमध्येच रमेश कदम असतील म्हणून रात्री उशिरापर्यंत पोलीस थांबून होते. पण रमेश कदम काही परतलेच नाही. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की कदम आपल्या काही कार्यकर्त्यांसह पोलिसांना सोमवारी दिवसभर गुंगारा देत होते. काही पोलिसांना हाताशी धरण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. सीआयडीच्या वेगवेगळ्या पथकांनी कदम यांचे मुंबईतील बोरीवलीतील निवासस्थान आणि ते अध्यक्ष असलेल्या जोशाबा ग्राहक संस्थेत छापे टाकून भ्रष्टाचाराशी संबंधित काही कागदपत्रे जप्त केली.
रमेश कदम फरार!
By admin | Updated: July 21, 2015 01:43 IST