श्रीगोंदा(अहमदनगर) : नातेवाईकांंना भेटायला येत नाही म्हणून ऊस तोडणी करणाऱ्या नर्मदाबाई पवार (रा. हिंगण, ता. अमळनेर) हिला पती नामदेव पवार, बापू गायकवाड यांनी रेल्वेतून ढकलून दिले. त्यातून ती बचावली म्हणून मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी विवाहितेने गळफास घेतल्याचा बहाणा केला. ही घटना १९ नोव्हेंबरला उख्खलगाव शिवारात घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी नामदेव पवार, बापू गायकवाड (रा. हिंगण, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांना मंगळवारी ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, १९ नोव्हेंबरला नर्मदा व नामदेव पवार, बापू गायकवाड हे रेल्वेने नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले, परंतु नर्मदा त्यांच्या सोबत जाण्यास तयार नव्हती. नातेवाईकाला भेटायला येत नाही याचा राग आल्याने रांजणगाव (ता. पारनेर) शिवारात दोघांनी नर्मदाला रेल्वेतून ढकलून दिले. रांजणगाव रेल्वे स्टेशनला उतरून ते पुन्हा माघारी आले. मृत्युशी झुंज देत असलेल्या नर्मदाला दोघांनी वाचविण्याऐवजी तिला मारहाण करून ठार मारले. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी उख्खलगाव शिवारात झाडाला नर्मदाचा मृतदेह साडीच्या साहाय्याने लटकावून तिने गळफास घेतल्याचा बहाणा केला. ही घटना उख्खलगाव शिवारातील काहींनी पाहिली आणि या क्रूर घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी तपास केल्यानंतर खून झाल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)
रेल्वेतून ढकलून खून
By admin | Updated: November 29, 2015 02:40 IST