दिघी : पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वाढत आहे. उपनगरांमधील वाढत्या लोकसंख्येला आवश्यक भाजी पुरविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या हेतूने महापालिकेच्या वतीने उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भाजी बाजार सुरू झाले आहेत. यातील बहुतांश अनधिकृत आहेत. या बाजारांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अधिकृत आणि हक्काचे व्यावसायिक गाळे नसल्याने पावसाळ्यात भाजी विक्रेत्यांच्या समस्यांमध्ये कित्येक पट वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिघी समाविष्ट होऊन २० वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. दिघीतील आरक्षणाचा न झालेला विकास हा प्रलंबित प्रश्न प्रामुख्याने विकासात अडथळा ठरत आहे. आरक्षित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून भाजी मंडईचा विषय रखडल्याने भाजी मंडई रस्त्यावर आली आहे. दिघीतील एकूण ३७ आरक्षणांपैकी चार मंडई व दुकानांसाठी आहेत. सर्व आरक्षणे ताब्यात घेऊन भाजी मंडईचा प्रश्न निकाली काढता आला असता. मात्र लोकप्रतिनिधी, प्रशासन व नगरविकासरचना विभाग दिघीच्या आरक्षणाबाबतीत ठोस निर्णय घेत नाहीत. दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला महत्त्वपूर्ण असा मंडईचा विषय अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे दुकानासाठी हक्काची जागा नसल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. छत्रपती संभाजीमहाराज चौकापासून भोसरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजीची दुकाने, फळांच्या हातगाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे परिसराला मंडईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसराच्या चारही बाजूंचे रहिवासी येथील रस्त्यावर भाजी खरेदीसाठी येणारी ग्राहकांची संख्या मोठी आहे. ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस जशी भर पडत आहे तशी ती भाजी विक्रेत्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक संथ झाली आहे. अतिक्रमण करून रस्त्यावर भाजीविक्री करणाऱ्यांवर पालिका अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येते. सततच्या होणाऱ्या अतिक्रमण कारवायांमध्ये मालाचे होणाऱ्या नुकसानामुळे भाजी विक्रेत्यांनी जायचे तरी कुठे, असा संतप्त सवाल करून प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. विक्रेत्यांचा हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयाने प्रायोगिक तत्त्वावर या रस्त्यावरील मोकळ्या असलेल्या खासगी मालकाच्या जागेवर भाजी मंडई भरविण्यात सुरुवात केली होती. मात्र जागेचा मोबदला देऊनसुद्धा पुरेशा सोई मिळत नसल्याने भाजी विक्रेते व ग्राहकांनी खासगी जागेतील मंडईकडे पाठ फिरवली. (वार्ताहर)>जाधववाडी : राजे शिवाजीनगर येथील भाजी मंडईत सर्वच भाजी विक्रेते आपली भाजी विकून झाल्यावर राहिलेला कचरा मंडई परिसरात टाकत असल्याने तेथे दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात या अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मंडईतील चिकनच्या दुकानांमागे मोठ्या खड्ड्यात घाण पाणी साचले असून, त्यामध्ये डास तयार झाले आहेत. त्यामुळे डेंगू, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या भाजीमंडईच्या प्रश्नाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.>निगडी : साईनाथनगर परिसरात कामगारवर्ग वास्तव्यास आहे. निगडीतून रुपीनगर या भागात जाणारा रस्ता साईनाथनगरमधूनच जातो. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सकाळी व सायकांळी या रस्त्याला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते व इतर खाद्यपदार्थ हातगाडी लावतात. यामुळे रस्त्याचा तीस ते चाळीस टक्के भाग या हातगाडीधारकांनी व्यापलेला असतो. त्यामुळे पादचाऱ्याला चालणेही मुश्कील होऊन जाते व वाहनचालकांना तारेवरची कसरत करून या गर्दीतून मार्ग काढावा लागतो. यामुळे या भागात स्वतंत्र भाजी मंडई असावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.>शाहूनगर : महात्मा फुलेनगर येथील कस्तूरी मार्के ट रस्त्यावरच भाज्यांच्या अनेक हातगाड्या उभ्या केलेल्या असतात. रहदारीच्या रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भाजीवाल्यांच्या कुजलेल्या, खराब भाज्या व फळे याचा ढीग साचून त्या ठिकाणी कचरा साचलेला दिसून येतो. त्यामुळे माशा, डास व अस्वच्छता भाजी मंडईत दिसून येते. भाजीमंडईचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी पालिकेने या ठिकाणी कचराकुंडी ठेवावी तसेच भाजी मंडईत विजेचे खांब असावेत , अशी मागणी भाजी विक्रेत्यांकडून केली जात आहे. या भाजी विक्रेत्यांकडून हप्ते देखील घेतले जात असल्याची चर्चा आहे.
भाजी मंडयांमध्ये समस्यांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 01:14 IST