मुंबई : अपघातानंतर मेंदू मृतावस्थेत गेलेल्या वाशीच्या फोर्टिस रूग्णालयातील मुलाचे मूत्रपिंड प्रतिक्षा यादीतील रूग्णांऐवजी सख्ख्या भावाला देण्याची मागणी एका कुटुंबाने केली होती. मात्र राज्य सरकारने कुटुंबाच्या या मागणीसाठी नियमात बदल केला. आणि बुधवारी उशीरा रात्री सेव्हन हिल रूग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे अवयवदानाला आणि प्रत्यारोपणाला परवानगी देण्यात आली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे मरणाच्या दारात उभ्या असलेल्या एका भावामुळेच दुसऱ्या भावाला जीवदान मिळाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मेंदू मृतावस्थेत गेलेल्या मुलाचे हृदय हे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयातील २७ वर्षीय महिला रूग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आल्याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली. या रूग्णालयातील ही तिसरी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.याआधी अपघातानंतर वाशीच्या फोर्टिस रुग्णालयात एका मुलाला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मेंदू मृतावस्थेत गेला. त्यावेळी रुग्णालयातील स्वयंसेवकांनी कुटुंबियांना अवयवदानाचे आवाहन केले. मात्र मुलाच्या भावाला मूत्रपिंड देणार असल्यास अवयवदान करु, अशी अट कुटुंबाने ठेवल्याने स्वयंसेवकही बुचकळ््यात पडले होते. स्वयंसेवकांसाठी अशी मागणी करणारी पहिलीच घटना असल्याने त्यांनी समन्वय समितीला संपर्क केला. नियमाप्रमाणे प्रतिक्षा यादीत असणाऱ्या व्यक्तींनाच अवयव दिले जातात. पण, राज्य सरकारने या कुटुंबियांची मागणी मान्य केली. बुधवारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
भावाने वाचवले प्राण
By admin | Updated: September 22, 2016 04:55 IST