चंद्रपूर कोळशाचा जिल्हा : मात्र वीज केंद्रालाच कोळसा मिळेना ! रवी जवळे -चंद्रपूरचंद्रपूर जिल्हा कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. मात्र चंद्रपूर वीज केंद्राला हा कोळसा मुबलक मिळत नसल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात पूर्वी सात दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा राहायचा. मात्र अलिकडे या साठ्याला कोळसा खाणीचे ग्रहण लागले आहे. आजमितीस वीज केंद्रात दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. याशिवाय रोज गरजेच्या तुलनेत पाच ते दहा हजार मेट्रीक टन कोळसा कमी पुरविला जात असल्याने वीज निर्मिती प्रभावित होत आहे.जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी असल्याने कोळशाचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिध्द आहे. त्यामुळे चंद्रपूरजवळ ऊर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र उभारण्यात आले. दोन हजार ३४० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले हे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज निर्मिती केंद्र आहे. कोळशाच्या जिल्ह्यात हे वीज केंद्र असल्याने पावसाळा वगळता या केंद्रातील वीज निर्मिती कमी होणे अपेक्षित नाही. मात्र दुर्दैवाने या केंद्रातून क्षमतेएवढी वीज निर्मिती अपवादात्मक स्थितीतच होते. या केंद्रात चार संच २१० मेगावॅट तर तीन संच ५०० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेले आहेत. २१० मेगावॅट क्षमता असलेल्या संचाला दररोज चार हजार मेट्रिक टन कोळसा लागतो तर ५०० मेगावॅट क्षमता असलेल्या संचाला दररोज १२ हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. कोळशाचा दर्जा सुमार असला तर दोन हजार ३४० मेगावॅट वीज निर्मितीसाठी ढोबळमानाने सुमारे ४५ ते ५० हजार मेट्रिक टन कोळशाची गरज पडते. काही वेळा तर याहून कमी कोळसा येतो. यामुळे वीज निर्मिती तर प्रभावित होते आहेच. शिवाय कोळशाचा स्टॉकही रिकामा होत आहे. पूर्वी सात दिवस पुरेल इतका साठा ‘इमर्जंसी’ म्हणून ठेवला जायचा. अलिकडे एवढा साठा कधीच राहत नाही. सध्या वीज केंद्रात दीड दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. रोज मागणीच्या तुलनेत कोळसा कमी येत असल्याने वीज निर्मितीवर आणि पर्यायाने राज्यातील वीज उपलब्धतेवर परिणाम होत आहे.
वीज निर्मितीला कोळशाचे ग्रहण
By admin | Updated: November 25, 2014 00:50 IST