औरंगाबाद : आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि तोच राहणार. इतर मागण्या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या असून, समाजाने तो प्रश्न वेगळा सोडवावा, असे स्पष्टीकरण राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या वतीने सूर्योदय परिवाराने बुधवारी येथे दिले. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाचे राज्यभर मोर्चे निघत आहेत. मोर्चाच्या आयोजनातील भय्यूजी महाराज यांच्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सूर्योदय परिवाराने पत्रकार परिषद घेऊन भय्यूजी महाराज यांची बाजू विषद केली.कोपर्डीतील घटना समोर आल्यानंतर दु:खी कुटुंबाला आध्यात्मिक बळ दिले. शाळेत जाण्यास घाबरलेल्या मुलींसाठी चार बसेस दिल्या. कन्याधाम सुरक्षा योजना सुरू केली, पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी धसास लागेपर्यंत लढत राहणार आहे, असे महाराजांच्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
आमचा अजेंडा कोपर्डीच राहणार - भय्यूजी महाराज
By admin | Updated: September 22, 2016 04:54 IST