ओतूर : कांद्याला देशात बाजारभाव वाढले, तेव्हा सरकारने परदेशातून ४५ रुपये किलोने कांदा आणला. दुसऱ्या देशाप्रमाणे आयात केलेल्या कांद्याच्या दराने म्हणजेच ४५ रुपये प्रतिकिलो कांद्याला भाव वा हमीभाव ठरवून द्या. ऊस, दूध यांचेही भाव शेतकऱ्यांना वाढवून द्या, तसे न केल्यास आळेफाटा (ता. जुन्नर) येथे भव्य असा रास्ता रोको करू. हा रास्ता रोको १२ सप्टेंबरला होणार आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.शेतकरी नेते, दिवंगत शरद जोशी यांच्या जयंतीच्या निमित्ताने ओतूर (ता. जुन्नर) जवळील नंदलाल लॉन्स येथे ३ सप्टेंबरला दुपारी राज्यस्तरीय कांदा, ऊस, दूध परिषद आयोजित केली होती. या परिषदेसाठी बारामती, मराठवाडा, नाशिक, सांगली, सातारा, पंढरपूर, सोलापूर, खेड, मंचर, चाकण, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या परिषदेसाठी गजानन राजबिंडे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नामखिळे, पुणे जिल्हा अध्यक्ष लक्षमण शिंदे, राष्ट्रवादीचे राज्य युवा उपाध्यक्ष अतुल बेनके, शंकरराव गायकवाड, दिलीप डुंबरे, बाळासाहेब घुले, दिनकर दाभाडे (विदर्भ), तानाजी बेनके, अशोक पराडे, श्रीमती ताजणे, संभाजी पोखरकर, अंबादास हांडे, संजय भुजबळ, मीनाक्षी ताजवे आदी मान्यवर व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करून शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या परिषदेच्या निमित्ताने ओतूर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. त्या रॅलीत हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या निमित्ताने संजय भुजबळ (तालुका अध्यक्ष), श्रीपती ताजवे, दिलीप डुंबरे, शंकरराव गायकवाड, लक्ष्मण शिंदे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. आंदोलनात राज्यभरातून हजारो शेतकरी सहभागी होऊ नयेत, असे वाटत असेल, तर कांद्यावरची निर्यात बंदी कायमचीच उठवावी. कांद्याला हमीभाव द्या, अशी मागणी पाटील यांनी केली.क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नामखिळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे सरकार व शेतकरी संघटनेचा माणूस निवडून दिला; पण हे सर्वजण दरोडेखोर निघाले, अशी घणाघाती टीका करून कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे. उसाचे लेव्ही साखर धोरण दुधाचा भाव याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पाण्याची बाटली २० रुपयाला, मग शेतकऱ्याच्या दुधाला ४० रु. प्रतिलिटर भाव द्या. त्यांचे वीजबिले भरली जात नाही, कारण, मोफत वीज घोषणेचे काय झाले, कांद्याला जीवनाश्यक वस्तूत टाका अशी मागणी या परिषदेत झाली.सर्व उपस्थितांनी शेतकरी संघटनेची शपथ घेतली. संजय भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. उमेश देवकर यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण शिंदे यांनी आभार मानले. (वार्ताहर)शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारभूत किंमत अधिक ५० टक्के नफा मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांवर वेगवेगळे कर बसवितात. यावर्षी कांद्याचे भाव पडले. कांदा नासला, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जोपर्यंत कांद्याची नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत आपण शासनाचा कोणताही कर भरावयाचा नाही, ही भूमिका आपणाला घ्यावी लागणार. गेली ३ वर्षे उसाचा भाव तोच आहे, कोणीही त्याविषयी बोलत नाही, फक्त शेतकरी संघटनाच बोलते. १२ सप्टेंबरच्या या रास्ता रोको आंदोलनात आम्ही कांद्याला हमीभाव मिळाल्याशिवाय जाणार नाही. - रघुनाथदादा पाटील
कांद्याला हमीभाव हवाच
By admin | Updated: September 5, 2016 01:41 IST