मुंबई : कुरार परिसरातून सुटका झालेल्या ओडिशाच्या ९ बालमजुरांना दोन महिने खोलीत डांबून ठेवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या मुलांना १२ ते १३ तास राबवून घेतले जाई. त्यांना मोबदला देणे दूरच दोन वेळचे जेवणही वेळेवर दिले जात नसल्याची माहिती मुलांनी दिली आहे. मूळचे ओडिशा येथील रहिवासी असलेल्या या मुलांचे ९ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले. कोलकाता परिसरात ४ दिवसांचे काम असल्याचे सांगून या मुलांना नेण्यात आले होते. जास्तीच्या पैशांच्या आमिषाने ही मुले निघून गेली. त्यानंतर कोलकातामार्गे या मुलांना मुंबईतील कारखान्यात नेण्यात आले. आपण मुंबईला केव्हा पोहोचलो हे या चिमुकल्यांना उमगलेच नाही. यामध्ये १३ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. मालाडच्या आप्पापाडा परिसरात असलेल्या दिवकृपा सोसायटीमधील खोलीत ही मुले राहत होती. मुंबईतील जापू शाखेचे एपीआय सुरेश शिंदे आणि तुकाराम जगताप यांच्या पथकाने छापा टाकून त्यांची सुटका केली. चौकशीत तब्बल दोन महिने या मुलांना खोलीतच डांबून ठेवण्यात आले होते. घरमालक बाहेर जाताना कुलूप लावून जात असे. तब्बल १२ ते १३ तास या मुलांकडून काम करून घेतले जाई. एक वेळ वडापाव खाऊन ही मुले गुजराण करत. अनेकदा या मुलांनी घरी जाण्यास हट्ट केला. पर्यायी मालकाचा मार त्यांच्या पदरी पडला. त्यांना डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत. ओडिशा पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. या प्रकरणी कारखाना चालक, त्याचा पार्टनर आणि दोन पर्यवेक्षकांना अटक करण्यात आली होती. संदीप निर्मल जाना (२८), जयप्रकाश तिलकधारी यादव (३५), विभास गुणेधर सामंत (२५) आणि मानस नंदन पाया (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (प्रतिनिधी)
नऊ बालमजुरांना दोन महिने ठेवले होते डांबून
By admin | Updated: July 1, 2016 02:46 IST