ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - 'नथुराम गोडसे यांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला नव्हता वा त्यांचे कधीही निलंबन झाले नव्हते. ते संघस्वयंसेवक होते' असा दावा गोडसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. ' अखेरच्या काळात त्यांनी संघावर बरीच टीका केली होती, पण तरीही १९३८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निजामाविरोधात छेडलेल्या आंदोलनात ते इतर स्वयंसेवकांसह सहभागी झाले होते' अशी माहिती नथुराम गोडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नातू सात्यकी सावरकर यांनी दिली आहे. ' इकॉनॉमिक टाइम्स'ने हे वृत्त दिले आहे. सात्यकी सावरकर हे हिमानी सावरकर यांचे पूत्र होत. सात्यकी यांचे वडील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू नारायण सावरकर यांचे पूत्र होत. त्यामुळे सात्यकी हे नथुराम गोडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांचे नातू आहेत.
2014 लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान राहुल गांधींनी आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून हत्या केली असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान मागे घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींविरोधात हा खटला चालणार असतानाच आता गोडसे यांच्या नातवाच्या या वक्तव्यामुळे राहुल यांना मदत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
' आम्ही नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांचे सर्व महत्वपूर्ण लिखाण संग्रहीत केले आहे. त्या लिखाणातून हेच स्पष्ट होते की नथुराम गोडसे हे संघाचे समर्पित कार्यकर्ते होते. मात्र संघाने काही ठिकाणी मवाळ भूमिका घेतल्याने त्यांचे संघासोबत मतभेद झाले' असे सात्यकी यांनी सांगितले. ' १९३२ साली सांगलीत असताना नथुराम गोडसे यांनी संघात प्रवेश केला. हिंदूंविरोधात होणा-या अत्याचारानंतरही संघ पुरेशी आक्रमक भूमिका घेत नसल्याचे त्यांचे मत होते. मात्र असे असले तरीही १९३८-३९ सालादरम्यान संघाने हैदराबादच्या निजामाविरोधात भाग्यनगर येथे छेडलेल्या 'मुक्तिसंग्रामात' ते सहभागी झाले होते. संघासोबत मतभेद असतानाही ते इतर स्वयंसेवकांच्या खांद्याला खांदा भिडवून या आंदोलनात उतरले होते. हैदराबादमध्ये राहणा-या हिंदूंच्या शोधार्थ राबवण्यात आलेल्या मोहिमेतील स्वयंसेवकाच्या तुकडीत नथुराम याचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी हैदराबादमधून अनेक लेख पाठवले, ते अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही झाले होते, ते आम्ही आजही जपून ठेवले आहेत' असेही सात्यकी म्हणाले.
' १९४२ साली विजयादशमीच्या दिवशी नथुराम यांनी स्वत: 'हिंदू राष्ट्र दल' या संस्थेची स्थापना केली. मात्र त्यांनी हिंदूंसाठी शिबिरे घेणे कायम ठेवले. फाळणीच्या मुद्यावरून १९४६ साली त्यांनी हिंदू महासभेचा राजीनामा दिला. ' असे त्यांनी सांगितले.