नीलेश शहाकार/बुलडाणा: शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतील लाभधारकांनी शासनाकडून प्राप्त होणार्या अनुदानाव्यतिरिक्त कपडे, दागिणे, आहेर, जेवण, पुजा, वाहन आदींवर लाखोचा खर्च केल्याचे उघड झाले आहे. या योजनेच्या स्थिती व अंमलबजावणीबाबत राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने ४ जून रोजी अहवाल तयार केला होता. हा अहवाल आता प्रसिद्ध करण्यात आला असून, यामध्ये शुभमंगल योजनेचे अनुदान घेऊनही अनेकांनी विवाह सोहळय़ांमध्ये अवास्तव खर्च केल्याचे समोर आले आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबांवर मुलीच्या विवाहाचा आर्थिक बोजा पडू नये, यासाठी राज्य शासनाने २00८ साली शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू केली. २0११ मध्ये या योजनेत काही सुधारणा करून सुधारित शुभमंगल सामूहिक तसेच नोंदणीकृत विवाह योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत वधू पित्याला १0 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. अनेक पालकांना कर्ज घेऊन मुलीचे हात पिवळे करावे लागतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकूवत असणार्यांना या योजनेत सहभागी करण्यात आले; मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही अनेक लाभार्थ्यांनी प्रतिष्ठेच्या हव्यासातून अनुदानाव्यतिरिक्त विवाहावर लाखो रुपयंची उधळण केल्याचे चित्र आहे. कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या सहा विभागात एकूण ५४७ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला. या योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी ३६६ लाभधारकांनी २५ हजाराचा खर्च, तर १३५ लाभधारकांनी ५0 हजारापर्यत खर्च केला. ३५ लाभधारकांनी ५0 हजार ते १ लाखापर्यंत, तर ११ लाभार्थ्यांनी १ लाखापैक्षा जास्त वैयक्तीक खर्च या योजनेतील विवाह सोहळय़ांमध्ये केल्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमुद केले आहे.
*कर्ज घेऊन केले विवाह
समारंभ योजनेत सहभागी ३६१ लाभार्थ्यांनी विवाहासाठी लागणारा अतिरिक्त खर्च स्वत:च्या उत्पन्नातून केला. १२९ लाभार्थ्यांनी नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतले. ५७ लाभार्थ्यांनी लग्नासाठी सावकारांकडून कर्ज घेवून लग्नाचा अतिरिक्त खर्च भागवला. योजनेत सहभागी १६ टक्के लाभार्थ्यांनी तर मुलींच्या विवाहासाठी हुंडा दिल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.