ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 07 - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार होत आहे. शुक्रवारी 8 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून सकाळी 9 वाजता शपथविधी पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात 19 नव्या चेह-यांना संधी मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाला संधी मिळते आणि कोणाची गच्छंती होते हे पाहावं लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या बहुतप्रतिक्षित विस्तारात एकूण 9 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपाचे 4 , शिवसेनेचे 2 आणि मित्रपक्षाच्या 3 जणांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांमध्ये सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे यांचा समावेश असून शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं नक्की झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र भाजपाकडून मंत्रिपदासाठीची नावे निश्चित झाली नसल्याचंही कळत आहे.
भाजपकडून मंत्रिपदासाठी पश्चिम महाराष्ट्र, सांगलीला प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक ही नावे आघाडीवर आहेत.तर मराठवाड्यातून सुधाकर भालेराव, संभाजी पाटील निलंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. पश्चिम विदर्भातून पांडुरंग फुंडकर, डॉ संजय कुटे, मदन येरावर यांची नावे पुढे येत आहेत. उत्तर महाराष्ट्र जयकुमार रावल, हरिभाऊ जावळे, या नावांची चर्चा आहे.