ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.२३ - देश्यातील आणि राज्यातील वाढत्या असहिष्णुतेमुळे दिग्गज मराठी साहित्यिकांनी आपले पुरस्कार मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्याच्या खाजगी सचिवाकडे परत केले. पुरस्कार, मानचिन्ह आणि पुरस्काराची रक्कम यावेळी त्यांनी सचिवांकडे सुपूर्द केली. या साहित्यिकांमध्ये प्रज्ञा पवार, गणेश विसपुते, संभाजी भगत, हरिश्चंद्र थोरात, मिलिंद माळसे, येशू पाटील, मुकुंद कुळे, उर्मीला पवार यांचा समावेश आहे.
दादरीतील घटनेनंतर सध्या देशभरातील अनेक साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत. यानंतर मराठी साहित्यिकांनाही राज्य सरकारने दिलेले विविध पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या देश अघोषित अशा आणीबाणीच्या पर्वातून जात असून १९७५ पेक्षा सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहिच्य आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात अपिरिमित दंडेलशाही सुरु असल्याचे असल्याचे लेखिका प्रज्ञा पवार यांनी म्हटले होते.
तर दिल्ली येथे आज साहित्य अकादमीने आपले मौन तोडले असून कुलबुर्गींच्या हत्येचा निषेध केला आहे. साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत घ्यावेत अशी विनंती अकादमीने केली आहे. आज सकाळी किमान १०० साहित्यिकांनी साहित्य अकादमी बाहेर मूकमोर्चा काढला होता. त्यानंतर साहित्य अकादमीने हा निर्णय घेतला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी साहित्य अकादमीने पुढाकार घ्यावा असे साहित्यिकांनी म्हटले आहे.