मुंबई : लोकमान्य टिळकांनी समाजाच्या हितासाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवामागील खरा अर्थ ओळखत, चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिकतेचे भान जपत गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाही मंडळ चलचित्र देखाव्यातून ‘स्वच्छतेचे’ धडे देणार आहे.चांदिवली म्हाडा कॉलनी परिसरात दरवर्षी सामाजिक विषय घेऊन येथील बाप्पाची सजावट करण्यात येते. या मंडळाचे चलचित्र पाहण्यासाठी येथे अनेकांची गर्दी असते. चलचित्रांची उत्कृष्ट मांडणी आणि सामाजिक विषय यामुळे मंडळाने अनेक पारितोषिकांवर नाव कोरले आहे. बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक अत्यंत साध्या पद्धतीने काढली जाते. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत होते. डीजेची क्रेझ कितीही असली, तरी मंडळाने डीजेला ‘नो’ म्हटले आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाची मिरवणूक निघते, असे मंडळ सांगते. (प्रतिनिधी)>असा झाला उत्सवाचा ‘श्रीगणेशा’१९९३ साली पहिल्यांदा मंडळाने बाप्पा आणला. अगदी साध्या पद्धतीने याची प्रतिष्ठापना करत, ९३ साली गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर, मंडळातील कार्यकर्त्यांची संख्या वाढली आणि कालांतराने उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. २००८ पासून स्थानिक नगरसेवक ईश्वर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली चलचित्रांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकला गेला. आजतागायत विविध सामाजिक विषयांवर आधारित चलचित्र देखावे मंडळ तयार करते.‘स्वच्छते’ची अभिनव स्पर्धा चांदिवली म्हाडातील ३२ सोसायट्यांसाठी स्वच्छता अभियानांतर्गत अभिनव स्पर्धेची घोषणा गणेशोत्सवानिमित्त नगरसेवक ईश्वर तायडे यांनी घोषित केली आहे. गणेशोत्सवापासून ते नवरात्रीपर्यंत ही स्वच्छता स्पर्धा असेल. सोसायट्यांना स्वच्छतेसाठी प्रेरित करण्यासाठी ‘आपला परिसर स्वच्छ परिसर’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी ५ हजार, ३ हजार आणि दीड हजार अशी रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक सोसायट्यांचा हुरूप वाढविण्यासाठी देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या काळात मंडळाचे कार्यकर्ते सोसायट्यांना भेटी देऊन स्वच्छतेची माहिती घेणार आहेत. विविध स्पर्धांची रेलचेलगुणवंत विद्यार्थ्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात येतो. विशेष म्हणजे, महिलांसाठीही अनेक स्पर्धांचे आयोजन मंडळ करते. महिला दिनाचे औचित्य साधत, येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या वेळी महिलांचा सत्कार करण्यात येतो, शिवाय १ मे २०१२ पासून मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. >चलचित्र देखावे : स्त्रीभ्रूणहत्या, केदारनाथ प्रलय, मानवी मूलभूत गरजा, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध सामाजिक विषयांचे चलचित्र देखावे मंडळाने आजवर साकारले आहेत. यंदा ‘स्वच्छता अभियान’ या विषयावर आधारित चलचित्र देखावा तयार केला असून, स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.उत्सवामागे काहीतरी सामाजिक हेतू असतो. केवळ आनंद म्हणून सण साजरा करण्यापेक्षा, समाजाबद्दल असलेली जबाबदारी ओळखत सण साजरा केला, तर तो साजरा केल्याचा आनंद वेगळा असतो. - संजय नलावडे, गणेशोत्सव स्मरणिका प्रमुख
चलचित्र देखाव्यातून सामाजिकतेचे धडे
By admin | Updated: September 5, 2016 02:01 IST