मुंबई : वाहतुकीच्या कोंडीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांसाठी एक खूशखबर आहे. पश्चिम उपनगरातील खेरवाडी येथील उड्डाणपूल व पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता लवकरच खुला होणार आहे. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. खेरवाडी उड्डाणपुलामुळे आता दहिसरपासून थेट वरळीपर्यंत सिग्नलविरहित प्रवास करता येईल; तर जोडरस्त्यामुळे दक्षिण मुंबईपासून पूर्व उपनगरामध्ये अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे. खेरवाडी उड्डाणपुलाचे अंतर ५८० मीटर असून, दक्षिणेकडील बाजूवर ३ मार्गिका आहेत. त्यामुळे खेरवाडी जंक्शनजवळ होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा एमएमआरडीएतर्फे करण्यात आला आहे.पूर्व मुक्त मार्गावरील पांजरपोळ- घाटकोपर जोडरस्त्याची लांबी २.८० किलोमीटर इतकी असून, हे काम पूर्ण झाल्याने १६.४ किलोमीटर मार्गाचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुुळे आता दक्षिण मुंबईतून पूर्व उपनगरापर्यंत एकाही सिग्नलशिवाय ३० मिनिटांमध्ये पोहोचता येऊ शकेल. खेरवाडी उड्डाणपुलाचे उद्घाटन सोमवारी दुपारी ३ वाजता तर पांजरपोळ-घाटकोपर लिंकरोडचे उद्घाटन साडे तीन वाजता होणार आहे. (प्रतिनिधी)
खेरवाडी उड्डाणपूल, पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता उद्यापासून खुला
By admin | Updated: June 15, 2014 02:23 IST